Emerging Asia Cup: टीम इंडियाने पाकनंतर 'या' संघाला लोळवलं, सेमीफायनलमध्ये केला प्रवेश
in Semi Final: इमर्जिंग एशिया कप 2024 या स्पर्धेत भारत अ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर आता भारत अ संघाने यूएईचाही पराभव केला. भारत अ संघाने यूएईविरुद्धचा सामना 7 विकेटने जिंकला. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी केली आहे. यासह टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. भारतापूर्वी अफगाणिस्तानचा संघही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. टीम इंडियाप्रमाणेच अफगाणिस्ताननेही ग्रुप स्टेजमधील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.
सामन्यात नेमकं काय घडलं?
पाकिस्तान संघावर शानदार विजय मिळवल्यानंतर इमर्जिंग एशिया कपमध्ये यूएई संघाशी सामना झाला. या सामन्यात UAE ने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा संघ पूर्ण 20 षटकेही फलंदाजी करू शकला नाही. हा संघ 16.5 षटकांत 107 धावांत सर्वबाद झाला. UAE संघाला पहिला धक्का भारतीय गोलंदाज अंशुल कंबोजने दिला आणि त्याने सलामीवीर मयंकला 10 धावांवर बाद केले. संघाची दुसरी विकेट आर्यांश शर्माच्या रूपाने पडली, जो एका धावेवर वैभव अरोराच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रसिक सलामने निलांशला 5 धावांवर, विष्णूला शून्यावर आणि सय्यद हैदरला 4 धावांवर बाद करत एका षटकात 3 बळी घेतले.
अभिषेक शर्माने बासिल हमीदला 22 धावांवर बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंततर सचितच्या रूपाने मिळाले. मात्र राहुल चोप्राने 45 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 50 धावांची खेळी केली आणि नेहल वढेराच्या चेंडूवर तो बाद झाला. भारतातर्फे रसिक सलामने 3, रमणदीप सिंगने 2 तर अंशुल कंबोज, वैभव अरोरा, अभिषेक शर्मा आणि नेहल वढेरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अभिषेक शर्माचे अर्धशतक
UAE ने दिलेल्या 108 धावांचा पाठलाग करताना भारताची पहिली विकेट 6 चेंडूत 8 धावा करून बाद झालेल्या प्रभसिमरन सिंगच्या रूपाने पडली. अभिषेक शर्माने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 24 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार तिलक वर्माने 18 चेंडूत 21 धावा केल्या शेवटी आयुष बडोनीने 12 तर नेहल वढेराने 6 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
सेमीफायनलमध्ये भारत कुणाशी भिडणार?
इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना बांगलादेश किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो. अफगाणिस्तान संघ सध्या अ गटात पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर टीम इंडिया ब गटात पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना अ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल. या स्थानावर बांगलादेश किंवा श्रीलंकेचा संघ पोहोचण्याची शक्यता आहे.