गणपतराव देशमुखांच्या दोन नातवांमधील वाद मिटला, आजीकडून नातवांचे मनोमिलन, उद्या सांगोल्यात मोठ्या घडामोडी
सुनील दिवाण, एबीपी माझा October 22, 2024 11:13 PM

Sangola Vidhansabha Election : सांगोल्याची विधानसभेची जागा ही पारंपारिक शेतकरी कामगार पक्षाकडे असताना महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाला दिल्याने आता शेतकरी कामगार पक्ष हा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या  सांगोल्यात मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे दोन नातू डॉक्टर अनिकेत देशमुख व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या गटात सुरू असलेला वाद मिटणार असून दोघांचे मनोमिलन होणार आहे. उद्याच्या शेकाप मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली जाणार आहे. 

रतनताई देशमुख यांनी केली मध्यस्थी , दोन भावंडांमधील वाद मिटला 

सांगोल्याच्या उमेदवारीसाठी स्वर्गीय गणपतरावांचे नातू डॉक्टर अनिकेत व डॉक्टर बाबासाहेब या दोन भावंडात सुप्त संघर्ष सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी  अनेक दिग्गजांनी  प्रयत्न केले होते. मात्र, हा दोघांमधील वाद मिटत नव्हता.  दरम्यान हा वाद संपण्यास आज शेवटी या दोघांची आजी श्रीमती रतनताई देशमुख यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत दोघांचे मनोमिलन घडवून आणले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याच घरात ही छोटी काही बैठक थोड्या वेळापूर्वी संपन्न होऊन श्रीमती रतन ताई यांनी दोघातले वाद संपवले. आता उद्या होणाऱ्या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष एक संघरतीने एकत्रित येत असून सांगोला विधानसभा पूर्ण ताकतीने लढवण्याची तयारी करण्यात आली आहे.

तिरंगी लढतीत कोणाचा फायदा होणार? 

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे हे एकत्र असूनही शहाजी बापू हे केवळ 768 मताने विजयी झाले होते . गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने आता पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष एक संघ बनला असून आता शेतकरी कामगार पक्षाची लढाई शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे यांच्यामध्ये होणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल 55 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले होते. गेल्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे एकत्र आल्याने शेतकरी कामगार पक्षाचा निसटता पराभव झाला होता. आता शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने शेतकरी कामगार पक्षाला या वेळेला पुन्हा एकदा सांगोल्यावर लालबावटा फडकवण्याची संधी असणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Unmesh Patil : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंसाठी भाजपशी भिडले, आता उन्मेश पाटलांना एबी फॉर्म, पत्नीला अश्रू अनावर


 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.