Maharashtra Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात सीआयडीने घेतले ताब्यात
Saam TV February 12, 2025 10:45 PM
Nashik Crime : नाशिकच्या पंचवटीत अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

भर वस्तीत मृतदेह आढळल्याने खळबळ

- डोक्यावर जबर मार लागला असल्याने घातपाताचा संशय

- दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

- नाशिकच्या पंचवटीत असलेल्या पेठ फाटा परिसरात घडली घटना

- घटनास्थळी पंचवटी पोलीस पथकासह श्वान , फॉरेन्सिक चे पथक दाखल

- मृतदेह आढळलेला इसम मजूर असल्याची माहिती

- मृतदेहा जवळ आढळली दारूची बाटली आणि ग्लास

खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात केज न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान सीआयडीने सुदर्शन घुलेची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र केज न्यायालयाने सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केज येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींवर केजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र सुदर्शन घुलेला सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता खंडणी प्रकरणात देखील सीआयडी कडून सुदर्शन घुलेची चौकशी आणि तपास केला जातो आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दोन आरोपींना अटक

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील "राजकारण महाराष्ट्राचे" या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

Maharashtra Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात सीआयडीने घेतले ताब्यात

सुदर्शन घुले आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मकोका कारवाईमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मात्र आता दोन कोटी खंडणी प्रकरणी सुदर्शन घुलेला सीआयडीने ताब्यात घेऊन केसच्या जिल्हा वस्त्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. काही वेळात त्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये किती वाद सुरू होईल. आरोपीचे वकील अनंत तिडके तर सरकारी वकील जे बी शिंदे हे आहेत.

रोजगार हमी योजनेची कामे बंद, मजूर अडचणीत

हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेच्या कामांना ब्रेक लागला आहे, हिंगोली चे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीओना लेखी आदेश देत पूर्वीची कामे पूर्ण झाल्याशिवाय नव्याने कामांना मंजुरी देऊ नये असे आदेश दिले आहेत दरम्यान प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शासकीय विहिरी जनावरांचे गोठे यासह पांदन रस्त्याची कामे खोळंबली आहेत.

भंडाऱ्यातील १०.७५ लाख जनावरांना पशुसंवर्धन विभागाचे वतीने रोगप्रतिबंध संजीवनी

शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी गावागावात जाऊन जनावरांना रोगप्रतिबंधात्मक डोस दिला. गत वर्षभरात १० लाख ७५ हजार ९२८ जनावरांना रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यामध्ये अँटी रॅबीज, घटसर्प, एकटांग्या, चौखुरा, आंत्रविकार, पीपीआर व देवी लसींचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या कामगिरीमुळे जनावरांची हानी टळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

कॉपी होत असल्यास पालकांनी संपर्क साधा,जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला मोबाईल नंबर

राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरू झाले आहेत काल इंग्लिश विषयाचा पेपर पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्रावर कॉपी आढळल्यास कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हिंगोली जिल्हा प्रशासन ॲक्शन मोड आले आहे, हिंगोलीत असलेल्या 40 परीक्षा केंद्रावर कुठेही कॉपी आढळल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असे म्हणत हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर केला आहे

Nashik: नाशिक पोलिसांची धडक कारवाई, एमडी ड्रग पेडलर जेरबंद

- ७२ हजारांचा एमडी ड्रग मुद्देमाल जप्त

- त्रिकोणी बंगला येथे गुप्त माहितीवरून छापा

- 8.5 ग्रॅम एमडी ड्रगसह संशयित सागर पाटील अटकेत

- गाडीतून तस्करीचा प्रयत्न उघड, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

- वरिष्ठ निरीक्षक सुशील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

- पोलिसांचा पुढील तपास सुरू, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

बांग्लादेशी नागरिकांच्या तपासात पुणे कनेक्शन समोर

- सुमन गाजी या बांग्लादेशी आरोपीकडे सापडले होते दोन देशांचे पासपोर्ट

- सुमन गाजीकडे सापडले होते भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे पासपोर्ट

- गाजीने 2014 साली पुण्यात पासपोर्ट बनवल्याचे नाशिक पोलीसांच्या तपासात उघड

- पासपोर्ट कसे तयार केले ? गाजीचे ईतर साथीदार कोण ? याचा तपास सुरू

- नाशिक पोलीसांनी आतापर्यंत 9 बांग्लादेशी नागरीकांना केली आहे अटक

एक महिना उलटूनही जालन्याच्या ईकरा या चिमुकलीचा शोध लागेना....

जालन्यातील अंबड शहरातून एक महिन्यापूर्वी तीनवर्षीय ईकरा मणियार या चिमुकलीच अपहरण झालं होतं .या अपहरणाला आज एक महिना पूर्ण झाला असला तरी अद्यापही पोलिसांना इकरा या चिमुकलीचा शोध लागलेला नाही.

शिंदेंच्या शिवसेनेचा काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या माजी प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. विधानसभा निवडणुकीत हेमलता पाटील यांचे तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसमध्ये सध्या गटबाजीच राजकारण सुरू असून नेत्यांचा कार्यकर्त्यांशी कनेक्ट राहिलेला नाही. प्रत्येक जण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय. याला कंटाळून पस्तीस वर्षांपासून हातात घेतलेला काँग्रेसचा झेंडा सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याचं हेमलता पाटील यांनी म्हटलय. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सारखीच एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश केल्याची माहिती हेमलता पाटील यांनी दिलंय. तर शिवसेना ठाकरे गट आजही काँग्रेसच्या जवळ आहे. प्रभागातील नागरिकांना शिवसेनेची भूमिका पटलेली नाही. त्यामुळे ठाकरे गटाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचे निकटवर्तीय दीपक दातीर यांनी केलाय.

Maharashtra Breaking Live : शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर शाहांचा सत्कार केला अशी टीका संजय राऊतांनी केली. राज्याचे तुकडे करणाऱ्या शाहांचाच हा एकप्रकारे सत्कार असल्याचे राऊत म्हणाले. Maharashtra Live Update: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी पक्षाला देणार सोडचिठ्ठी

रत्नागिरी - निष्ठावान राजन साळवी यांची पक्ष प्रवेशाची तारीख जवळपास निच्छित सुत्रांची माहीती

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी पक्षाला देणार सोडचिठ्ठी

माजी आमदार राजन साळवी उद्या करणार शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंद आश्रम येथे करणार पक्ष प्रवेश

उद्या दुपारी ३ वाजता आनंदाश्रम येथे होणार राजन साळवी यांचा पक्षप्रवेश

मशाल सोडून राजन साळवी घेणार धनुष्यबाण हाती

निष्ठावान राजन साळवी उद्धव ठाकरे यांना करणार जय महाराष्ट्र

राजन साळवी यांच्या सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील जाण्याची शक्यता

मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून आरोग्य विभागात नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या आरोपीस सातारा शहर डीबी पथकाने केली अटक

मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत आरोग्य विभागात नोकरीचे अमिष दाखवून दोघांची फसवणूक करणाऱ्या आरोपी राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे याला सातारा शहर डीबी पथकाने अटक केली आहे. या आरोपीने 6 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करून पैसे माघारी देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत, दोनशे रुपयांनी सोयाबीनचे भाव ढासळले

धाराशिव - सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एखदा अडचणी सापडला आहे.सोयाबीनचे भाव दोनशे रुपयांनी उतरले आहेत.ऐकीकडे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असतानाचा सोयाबीनचे भाव माञ ढासळले आहेत.धाराशिवच्या कळंब बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3700 ते 4100 रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. जिल्ह्यात सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राकडे 35 हजार 403 शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी केली होती यामध्ये केवळ 14 हजार 257 शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाली माञ खरेदी केंद्राची मुदत संपल्याने एकट्या धाराशिव जिल्ह्यात 21 हजार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी रखडली हे शेतकरी आता बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहेत माञ यामध्ये देखील भाव उतरल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील वलगाव दर्यापूर महामार्गावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात

अमरावती जिल्ह्यातील वलगाव दर्यापूर महामार्गावर वलगाव जवळ ट्रॅक्टर व दुचाकी चा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. बबलू मुन्ना बायस्कर असे मृतकाचे नाव असून हा बैतूल मध्य प्रदेशातून शेतीच्या कामासाठी वलगाव येथे आला असताना त्याला ट्रॅक्टर ने जबर धडक दिली व ट्रॅक्टर चालक तिथून पसार झाला.पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून वलगाव पोलीस घेत असून चौकशी करत आहे...

सांगली शहरात शाळकरी मुले देखील नशेच्या आहारी... शाळकरी मुलांकडून सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा..

सांगली शहरात शाळकरी मुलांकडून सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही पालकांनीच शाळकरी मुले सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचे चित्रीकरण करत हा

प्रकार उघडकीस आणला आहे. या व्हिडीओ मध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका उद्यानात भर गर्दीत सात-आठ मुले गोल करून वेप हुक्का ओढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शाळकरी मुले देखील नशेच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या बागा, उद्याना व नदीकाठच्या घाटा पर्यंत पोलिस पहारा ठेवावा, अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. तसेच उद्यानांमध्ये चाललेल्या या प्रकारावर अंकुश ठेवण्यासह शाळकरी मुलांकडे नशेच्या या वस्तू येतात कशा, याचा शोध आता घ्यावा अशीही मागणी होत आहे.

शिर्डीत पुन्हा एकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

शिर्डीत दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच काल रात्री आणखी एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.. नगरपालीकेचे सेवा निवृत्त कर्मचारी शौकत शेख यांच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.. 36 वर्षीय सादीक शेख हा तरुण प्राणघातक हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिर्डीकरांनी पोलीस ठाण्यावर धाव घेत ठिय्या आंदोलन सुरू केले.. दरम्यान पोलीसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून दिड महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.. पोलिस घटनेचा पुढील तपास करत असून शिर्डीतील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे..

अलिबागमध्ये खंडोबा पालखी सोहळा उत्साहात

अलिबाग कोळीवाड्यातील खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. मंदिरापासून निघालेल्या पालखी मिरवणुकीत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जात होती. ठिकठिकाणी देवाचे पूजन केले जात होते. पारंपरिक बँडच्या तालावर महिला यात बेधुंद होऊन नाचत होत्या.

जुन्या वादातून युवकाचा तीन महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला

बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढली असून दररोज हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत. मध्यरात्री खामगाव शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीत गोलू सारसर या युवकाने घरात शेजारी राहणाऱ्या तीन महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला हा हल्ला इतका भीषण होता की एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला या गंभीर जखमी झाल्या आहेत दोन्ही जखमी महिलांवर अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू असून दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे हल्ला केल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता मात्र पोलिसांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास आरोपीला अटक केली आहे यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याच चित्र समोर आल आहे.

वाशिम जिल्ह्यात बारावीच्या पहिल्या पेपरला 361 विद्यार्थ्यांची दांडी...

राज्यासह वाशीम जिल्ह्यात बारावीच्या पेपरला कालपासून सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इंग्रजीच्या पहिला पेपरला वाशिम जिल्ह्यातील ३६१ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी २२२८२ विद्यार्थ्यांपैकी २१९२५ विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या पेपर दिला यात पहिल्याच पेपरसाठी ३६१ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याच समोर आल आहे.

आता आम्ही लाडक्या बहिणीच्या बाजूंनी,पैसे बंद होणार यासाठी लढा उभारणार - जयंत पाटील

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे.आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार असून लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत,यासाठी आमचा लढा राहणार असून आम्ही तुमच्या मागे आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर केली आहे,लाडक्या बहिणी अपात्रतेवरून आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका जाहीर केली आहे, सांगलीच्या कुंडल येथे आयोजित कार्यक्रम होते ते बोलत होते,लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत,त्यांना तुम्ही शब्द दिला आहे,त्यामुळे एकदा दिले तर दिले,त्यांनी मतं दिली आहेत,त्यामुळे बघून द्यायचे होते,आम्ही घाई करा म्हणत होतो का ? अश्या शब्दात महायुतीला खोचक टोला लगावत जयंत पाटलांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल एक्झीट 6 महिन्यासाठी राहणार बंद, ट्रायल सुरु

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शन सिग्नल फ्री करण्यात येणार आहे. यासाठी कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणंपुल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आलंय. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा पुढील 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी MSRDC कडून देखील खबरदारी घेण्यात येत असून बॅरिकेट आणि सूचना फलक लावत वाहन चालकांची ट्रायल घेण्यात येतेय. पुढील निर्देश येताच पनवेल एक्सिट बंद करण्यात येणार असून या प्रकल्पासंदर्भात कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांनी अधिक माहिती दिलेय.

Maharashtra Live Update: विधानसभेला महाविकास आघाडीत दगाबाजी; शेकाप नेते जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप शेकाप नेते जयंत पाटील यांनी अलिबागच्या सभेत आहे. मित्रपक्ष आणि आघाडीच्या लोकांनी दगा दिला नसता तर जिल्ह्यात शेकापचे चार आमदार असते परंतु आपल्याला त्यावर आता भाष्य करायचं नाही असं जयंत पाटील म्हणाले. आपण इंडिया आघाडीसोबतच आहोत. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीच्या विजयात डाव्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगताना विधानसभेच्या वेळी तत्व पाळलं गेलं नाही असा आरोप पाटील यांनी केला. आम्ही केवळ 15 जागा मागितल्या होत्या. आता ते आपली चूक कबूल करताहेत असं जयंत पाटील यांनी जाहीर भाषणात सांगितलं.

- नागपूर रेल्वेस्टेशनसमोरील उड्डाणपूल व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत दुटप्पी धोरण

- नगर विकास विभागाचे उपसचिव आणि नागपूर मनपा आयुक्त उच्च न्यायालयाच्या रडारवर

- न्यायालयाने या दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावून येत्या गुरुवारी प्रत्येक्ष हजर राहण्याचे निर्देश दिलेय

- या अधिकाऱ्यांवर न्यायालय अवमाननेची कारवाई का केली जाऊ नये? याबाबत स्पष्टीकरण मागीतलं

- पूनर्वसनाची प्रक्रिया तातडीने व्हावी, यासाठी ३५ पिडीतांनी याचीका दाखल केलीय

Chhatrapati Sambhajinagar - ठिंबक अनुदान

लाडक्या बहिणी योजनेचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारे ठिबकचे अनुदान थकले आहे. निधी नसल्यानं पैसा कुठून द्यायचा असा प्रश्न कृषी विभागाला पडला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ठिबकचे पाच कोटी साठ लाख अनुदान थकलेले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी ठिबक अनुदान सबसिडी दिली जाते. ती यावर्षी आलीच असल्यामुळे शेतकरी सुद्धा स्वतःचे पैसे खर्च करून ठिबक शेतात घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही.

अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळेची मुख्याध्यापिका 60 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात...

बुलढाण्याच्या शेगाव येथील अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा येथील मुख्याध्यापिका सीमा वनकर यांच्याकडून सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडून अहवाल देण्यासाठी 2 लाख रुपयाची मागणी केली होती, त्यापैकी तडजोडीअंती दोन महिन्याचे 60 हजार रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.. या कारवाईमध्ये प्रामुख्याने तक्रारकर्ता महिला, आरोपी महिला आणि कारवाई करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी देखील महिला असल्याचा योगायोग पाहायला मिळाला आहे...

रत्नागिरी - कोकणात आणखी एका प्राचीन मंदिरात प्रवेश करण्यासाठी नियमावली

गुहागर मधील वेळणेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी मंदिर समिती कडून कपडे परिधान करण्यावरून भाविकांना सूचना

राज्यभरातून दर्भन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना पारंपारिक वेशात असल्यास मिळणार मंदिरात प्रवेश

नियमावली बाबत मंदिर समिती कडून प्रवेशद्वारावर सूचना फलक

वेळणेश्वर हे प्राचीन मंदिरांपैकी एक

एक एप्रिल पासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार

तरूण शेतकरी घेताहेत फुलांच्या शेतीतून लाखोंचा उत्पन्न

यवतमाळच्या जवळा येथील नयन राऊत या तरूण शेतकऱ्यांने त्यांच्या चार एकर शेतीत बिजली,गलांडा,चमेली,निशिगंधा आणि मोगरा या फुलांची लागवड केली असून यातून लाखोंचा उत्पन्न मिळत आहे.विशेष म्हणजे दारव्हा कडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर शेती असल्याने ये-जा करणाऱ्यांचे फुलांची शेती लक्षवेधून घेताहेत.

शेतकरी कामगार पक्षाच्या पुनर्बांधणीस सुरूवात

विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर या पक्षाची मोठ्याप्रमाणात पडझड सुरू झाली. पक्षाच्या राजकीय अस्तित्वावरती प्रश्न चिन्ह निर्माण झालेल असताना सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जिल्हाभरात शेकाप चे संवाद मेळावे घेत पक्ष पुनर्बांधणीस सुरूवात केली आहे. या संवाद दौऱ्याची सांगता अलिबाग येथे झाली. हा दौरा निवडणूकांऐवजी नवीन कार्यकर्ता घडवीण्यासाठी असून निवडणूका येतील, सत्ता आम्ही घेतल्या आणि गेल्या पण तरुणांना शिकवण्याची हि वेळ आहे. वैचारीक दृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तो पर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नसल्याचे मत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल.

पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यात 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या.. सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ मध्ये 34..

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे, शेतमालाला हमीभाव नाही, कर्जबाजारीपणा,विविध कारणांमध्ये होत असलेली पिवळणूक त्यामुळे जानेवारी महिन्यात पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात 34, अमरावती 19, बुलढाणा 10, अकोला 10 वाशिम जिल्ह्यात 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी अमरावती विभागीय आयुक्तानी दिली,मागील वर्षी पश्चिम विदर्भात तब्बल 1151 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात 344 झाल्या होत्या, आता पुन्हा 2025 च्या नवीन वर्षात सुद्धा शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जातं आहे

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द; 127 जणांवर कारवाई

बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शास्त्र प्रमाणे रद्द निलंबित करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवानाचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्रपरवाण्याचा मुद्दा चर्चेत आला.

बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना अटक.

नवी मुंबईतील उरण परिसरातून पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेय. कुठल्याही वैध कागदपत्राशिवाय हे सातही जण भारतात घुसखोरी करुन बनावट कागदपत्राच्या आधारे वास्तव्य करत होते. खाजगी विकासकाच्या द्रोणागिरी येघील बांधकाम साईटवर हे सर्व सात जण काम करत असताना उरण पोलीसांना यासंदर्भात माहिती मिळाली असता तात्काळ कारवाई करत या सातही बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेत अटक करण्यात आलेय. मात्र कागदपत्रांची पडताळणी न करता या बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या खाजगी विकासकाच्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

जालन्यात न्यायालय परिसरात तलवारीसह कोयता घेऊन फिरणारे दोघेजण जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

जालन्यात न्यायालयाच्या आवारात अवैधरित्या धारदार तलवार ,कोयता आणि कुऱ्हाड बाळगून फिरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलय.श्रीकांत उर्फ शिरया ऋषीकुमार ताडेपकर आणि सागर रेड्डी असं संशयित आरोपींची नावे आहेत. हे आरोपी घातपात करण्याच्या उद्देशाने न्यायालय परिसरात अवैध धारदार तलवार ,कोयता आणि लोखंडी कुऱ्हाड बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना न्यायालय परिसरातून ताब्यात घेतलय .या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळात दुय्यम निबंधकांसह चौघांवर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर शेत जमिनीची विक्रीपत्र तयार करून देणाऱ्या दुय्यम निबंधकांसह चौघांवर यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतमालकाच्या नावाने तोतयाला उभे करून आठ हेक्टर 49 आर शेतीची परस्पर खरेदी करून दिली हा प्रकार उघड होऊ नये म्हणून शेतमालकाला वेगळ्या प्रकरणात अडकण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणी दुय्यम निबंधकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

देशभरातील तब्बल १२ लाख ५८ हजार १३६ विद्यार्थ्यांनी ‘जेईई मेन २०२५’ ही परीक्षा दिली

या परीक्षेत तब्बल १४ विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षेतील पेपर एकमध्ये १०० एनटीए स्कोअर मिळविण्यात यश आले आहे

यात महाराष्ट्रातील विशाद जैन या विद्यार्थ्याला १०० एनटीए स्कोअर मिळाला आहे

देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते

ही परीक्षा २२, २३,२४,२८ आणि २९ जानेवारी दरम्यान ३०४ शहरांमधील ६१८ केंद्रांवर घेण्यात आली

जिथून विमानात बसले तिथेच परतले! ऋषिराज सावंत यांच्या अपूर्ण बँकॉक वारी ची राज्यभर चर्चा

जिथून विमानात बसले तिथेच परतले! ऋषिराज सावंत यांच्या अपूर्ण बँकॉक वारी ची राज्यभर चर्चा

परतीच्या प्रवासाची ऋषीराज यांना नव्हती कल्पना

पुण्याहून बँकॉकच्या दिशेने निघालेले विमान पोर्ट ब्लेअर जवळून पुण्यात परतले

बँकॉक ऐवजी पुन्हा पुण्यात आल्याचे समजल्यानंतर तिघांनाही मोठा धक्का बसला

विमानात बसलेल्या ऋषीराज आणि त्याच्या मित्रांना पायलट ने कळू सुद्धा दिले नाही

पुणे पोलिस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या पाठपुराव्यामुळे ऋषिराज प्रवास करत असलेले विमान पुन्हा पुण्यात उतरविण्यात आले.

टेमघर प्रकल्प बाधितांकडून लाचेची मागणी

उपविभागीय कार्यालयातील महिला लिपीक व मध्यस्थासह दोघांना अटक

टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांची लाच

शिरुर उपविभागीय कार्यालयातील लिपिक महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

शिरुर उपविभागीय कार्यालयातील लिपिक सुजाता मनोहर बडदे, तानाजी श्रीपती मारणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत एकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती

Pune : राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा

राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) ची मागणी

पुणे पोलिसांची भेट घेऊन केली मागणी

सचिन खरात यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट

सोलापूरकर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सोलापूरकर यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

सोशल मीडियावर सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल

Pune : पुण्यातील कोथरूडमध्ये आत्तापर्यंत ४७ डुकरांचा मृत्यू

कोथरूडमध्ये डुकरांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत त्यातच पुन्हा एकदा पाच डुकरांचा मृत्यू

महापालिकेने डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठवून चार दिवस होऊन गेले तरीही अजूनही अहवाल आलेला नाही

या सर्व प्रकरणाचे गांभीर्य वाढत चालले आहे

कोथरूड पीएमपी डेपो येथील भारतीनगर तेथील नाल्यामध्ये गेल्या १० दिवसापासून मृत डुकरे सापडत आहेत

महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. तक्रार केल्यानंतर ही डुकरे उचलून नेण्यात आली आहेत

सातत्याने या परिसरात मृत डुकरे सापडत असल्याने याचे नेमके कारण काय ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

Pune : पुणे जिल्ह्यातील ८४ टक्के कंपन्यांना उद्योग वाढीची अपेक्षा

एमसीसीआयएच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राची स्थिती आणि त्याची अपेक्षा समजून घेण्यासाठी सर्वेक्षण

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’च्या (एमसीसीआयए) तिसऱ्या मासिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील १०८ कंपन्यांपैकी ८४ टक्के कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात चालू आर्थिक वर्षात सकारात्मक वाढीचा अंदाज केला व्यक्त

दहा ते वीस टक्के वाढीचा अंदाज असलेल्या कंपन्यांची संख्या पहिल्या मासिक सर्वेक्षणात २६ टक्के, दुसऱ्या सर्वेक्षणात ३२ टक्क्यांवर पोचली होती, तर तिसऱ्या सर्वेक्षणात ही संख्या ३६ टक्क्यांवर पोचली आहे

सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे ः

- संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपन्यांची सकारात्मक वाढीची अपेक्षा कायम

- सहा टक्के कंपन्यांनी घट होण्याचा अंदाज

- २० टक्के उत्पन्न वाढीची शक्यता असलेल्या कंपन्यांची संख्या घटली

Pune Live Update: पुणेकरांना चटके बसायला सुरुवात! पारा ३६ अंशांच्या पुढे

पुणे शहरातील कमाल व किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ३६.७, तर तळेगाव येथे सर्वाधिक ३७ अंश कमाल तापमानाची नोंद

फेब्रुवारी महिन्यात थंडीचा हलका जोर असतो, तर कमाल तापमानही कमी अधिक होत असते

मात्र, यंदा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली

मार्च महिन्यात जाणवणारा उन्हाचा चटका फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून जाणवू लागला आहे

मागील पंधरा दिवसांपासून कोरेगाव पार्क, वडगावशेरी मगरपट्टा, हडपसर यासह शिवाजीनगर भागांतील कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे असल्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.