Maharashtra Politics News live : खोक्याच्या वकिलाकडून जामीन अर्ज मागे; सुनावणी होण्याआधीच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sarkarnama March 12, 2025 08:45 PM
Satish Bhosale Arrest : जामीन अर्ज घेतला मागे

आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलांनी मागे घेतला आहे. पोलिसांनी खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आल्याने वकिलांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान, खोक्याला पुढील एक-दोन दिवसांत बीडमध्ये आणले जाणार आहे.

Jagdeep Dhankhar Update : रुग्णालयातून घरी सोडले

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आज त्यांना घरी सोडण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Nashik Update : होळी सणाच्या निमित्ताने नाशिक लासलगाव बाजार समिती चार दिवस बंद

आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत उद्यापासून (रविवार) सलग चार दिवस बंद राहणार आहे. लासलगाव व्यापारी संघटनेने तसे पत्र बाजार समितीला दिले आहे. होळी निमित्ताने बाजार समिती बंद राहणार असून सोमवारपासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरू होतील.

Shaktipeeth Express : शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज आझाद मैदानात हजारो शेतकरी एकवटले

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज आझाद मैदानात हजारो शेतकरी एकवटले. शक्तिपीठ महामार्ग विरोधात विधानसभेवरती मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत.

Crime Update : लातूरमध्ये भर दुपारी टोळी युद्ध भडकले; पोलिसांनी चौघांना केले अटक

लातूरमध्ये भर दुपारी रस्त्यावर एका युवकाला सात ते आठ लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे टोळी युद्ध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana : पवार अन् सरदेसाईंना हवे होते पॉईंटेड उत्तर, आदिती तटकरे म्हणाल्या...

आमदार रोहित पवार, आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का? असा सवाल केला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी यावर लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, असं म्हटलं आहे.

ICC President Jay Shah : जय शाह यांच्या खोट्या 'पीए'ला अटक

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा खोटा पीए बनून जीवनाचा आनंद घेणाऱ्या भामट्याला उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी अटक केली आहे. अमरिंदर सिंग असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक बनावट बीसीसीआय कार्डही जप्त केले आहे.

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील वाँटेड कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दाव्याने खळबळ

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत वाँटेड असलेला कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा खळबळजनक दावा, एका स्थानिक वकिलाने केला आहे. नाशिक पोलिसांनी या दाव्याची दखल घेत, पडताळणी सुरू केली असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case :देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी येत्या 26 तारखेला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ तारखेला होणार आहे. सरकारी पक्षाने वेळ मागितला होता, त्यांना कोर्टाने वेळ वाढवून दिला आहे. कोल्हापूरचे वकील विकास खाडे हे आरोपींचे वकील आहेत.

सुरेश धसांचे मुंडे यांना प्रत्युत्तर

आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी कॅमेऱ्यामागे फिरत नाही, कॅमेरे माझ्यामागे फिरकात, असे सांगत धसांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिले आहे. पंकजा मुंडे यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार, असे धस यांनी सांगितले.

Satish Bhosale News: सतीश भोसले याला अटक

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कट्टर समर्थक 'खोक्या' सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बीडचे पोलिस त्याला बीडला आणण्यात येत आहे.

Ajit Pawar : मंत्री नितेश राणेंना अजित पवारांनी फटकारलं, म्हणाले की, ‘या देशातला जो मुस्लिम...’

गेल्या काही दिवसांपासून मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत. आताही त्यांनी मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाची घोषणा केली आहे. यावरून नवा वाद सुरू झाला आहे. याच वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, 'या देशातील मुस्लिम देशप्रेमीच आहेत', असे म्हणत टोला लगावला आहे.

Pratap Sarnaik : रस्ते अपघाताची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची विधानसभेत धक्कादायक माहिती

राज्यात गेल्या तीन वर्षात तब्बल 1 लाख 4 हजार 710 अपघातांमध्ये 45 हजार 961 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. दारूप्रमाणेच ड्रग्ज सेवन केलेल्या चालकांचीही टेस्ट यापुढे घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

Sanjay Raut : खासदार राऊत यांची मंत्री नीतेश राणे यांच्यावर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्यावर टीका केली आहे. धनगर समाज मेंढी अन् बकरीला मुलांप्रमाणे जपतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना इतिहासाचे धडे द्यावे, असा देखील सल्ला दिला आहे.

Resolutions of Madhi Gram Sabha : मढी ग्रामसभेच्या ठरावाला स्थगिती

मढी यात्रेदरम्यान मुस्लिम व्यवसायिकांना व्यापार करण्यास मनाई करत जागा देऊ नये, असा ठराव मढी ग्रामसभेत झाला होता. या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याबाबत मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर आता मढी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Bageshwar News : हिंदू राष्ट्र करण्याआधी कट्टर हिंदू परिवार करणे गरजेचे : बागेश्वर बाबा

भारताला आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे असून त्याआधी आपल्याला एक व्हावे लागेल. पण त्याहीआधी आपल्याला एक कट्टर हिंदू आणि हिंदू परिवार तयार करावे लागतील. त्यातून हिंदू तालुके आणि जिल्हा आणि शेवटी हिंदू राष्ट्र तयार होईल, असे वक्तव्य बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी केलय. ते नांदेड येथे शिवपुराण कथेत बोलत होते. त्यांचे आता हे वक्तव्य राज्यात चर्चेला आलं आहे.

Nitesh Rane News : "औरंग्याची निशाणी नष्ट केलीय, आता कबरही उखडून काढू", नीतेश राणेंचा कडक शब्दांत स्पष्ट इशारा

सपा आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबवर उफाळून आलेल्या प्रेमानंतर राज्यात संतापाची लाट उसळी. यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याचे मुळ कारण औरंगजेबची कबर असून तिच उखडून काढा असे म्हणत संताप व्यक्त केला होता. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले असून ती भारतीय पुरातत्व विभागाच्या अख्यत्यारीत आहे. यामुळे असं लगेच निर्णय घेता येत नाही. पण आमचं सरकार ही कबर काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटलं होते. यानंतर आता मंत्री नितेश राणे यांनी औरंग्याची निशाणी नष्ट केलीय, आता कबरही उखडून काढू, अशा शब्दात इशारा देताना लाँग मार्च काढू असे म्हटलं आहे.

Pune Mahavitaran News : पुणे महावितरणचा 51 हजार ग्राहकांना दणका! वीजपुरवठाच केला खंडित

महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे आता महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कठोर पाऊल उचलले असून एका महिन्यात 51 हजार 735 ग्राहकांना झटका दिला आहे. या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन खटला सुरू, पहिली सुनावणी

अख्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा आज (ता.12) पासून न्यायालयीन खटला सुरू होत आहे. आज या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला असून त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. तर आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून वाल्मिक कराडचे आणखी कोणते कारनामे समोर येतात ते पाहावं लागणार आहे.

Nitesh Rane : नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा

मंत्री नितेश राणे यांनी हिंदू खाटीक समाजातील तरूणांची बेरोजगारी थांबावी आणि हिंदूंना हिंदू माणसाकडून झटका मटण मिळावे म्हणून मल्हार झटका मटण संकल्पने आणली आहे. त्यांच्या या संकल्पनेला धनगर परिषदेने पाठिंबा दिला आहे. याबाबत अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राणेंना पत्र देण्यात आलं आहे.

Dharmaveer Fort : स्मारकासाठी निधी पण धर्मवीर गडाचा विसर? भाजप आमदाराने सरकारचे टोचले कान

नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वर आणि त्यांचे बलिदान झालेल्या तुळापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली. या ठिकाणांचा विकास करण्याची घोषणा केली. यावरूम आता भाजप आमदारानेच सरकारचे कान टोचताना घरचा आहेर दिला आहे. भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी, छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात तब्बल 33 दिवस धर्मवीर गडावर ठेवण्यात आले होते, तेथेच त्यांचा अनन्वित छळ केला. जी भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झाली, अशा श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाला विकास निधी देण्यास सरकार कमी पडले आहे. या गडाच्या विकासासाठी कोणताही निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला नसल्याचे म्हटलं आहे.

Non-Creamy Layer News : नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत करण्यासाठी केंद्राकडे शिफारस

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्य सरकारकडून क्रिमिलेअरबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिलीय. विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. तर याच्याआधीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात केंद्राकडे यासंदर्भात शिफारस करण्यात आल्याचेही मंत्री सावे यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.