जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे तर काही जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. तिथल्या प्रशासनाकडून जखमींना आणि तिथं असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत केली जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले की, नाव विचारून खूपच चुकीचा हल्ला झाला आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला रोखण्याचा प्रयत्न झालाय. मात्र काश्मीर किंवा भारताचा विकास रथ थांबणार नाही. गृहमंत्रीही तिथं पोहोचतायत. महाराष्ट्रातले दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. काही जण जखमी झाले आहेत. तिथं प्रशासनाकडून मदत केली जात आहे. आम्हीही त्यांच्या संपर्कात आहे.
पहलगाममध्ये ज्या शक्तींनी हे केलंय त्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत थांबणार नाही. मी तिथल्या प्रशासनाच्या संपर्कात आहे. कलम ३७० नंतर खूप वेळ गेलाय. काश्मीरचा विकास होत आहे आणि तो पाहवत नाहीय त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला केला जात आहे असंही फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भ्याड हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे गृहमंत्री अमित शहांना तिकडं पाठवलंय. निरपराध पर्यटकांना मारण्यात कसली मर्दुमकी आहे? हा भ्याड हल्ला आहे. हे पाकडे सर्जिकल स्ट्राइकनंतर बिळात लपले होते. या पाकड्यांचा बदला जशास तसा घेतला जाईल. त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री पाकड्यांना सोडणार नाहीत. निरपराधांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाहीत.
पुण्यातील दोन कुटुंबंकाश्मीर हल्ल्यावेळी पहलगाममध्ये पुण्यातील ५ जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे अशी त्यांची नावे आहेत.यातील जगदाळे कुटुंबीय हे कर्वेनगर परिसरातील असून गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत असल्याची प्राथमिक माहिती समजते.