आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने 18 व्या मोसमात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबईने रविवारी 27 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत सलग पाचवा तर एकूण सहावा विजय मिळवला. मुंबईने 216 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौला 161 वर ऑलआऊट केलं. मुंबईने अशाप्रकारे 54 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. मुंबईला या विजयानंतर तगडा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतल्याने टॉप 5 मधील संपूर्ण चित्रच बदललं आहे.
मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची मॅरेथॉन झेप घेतली आहे. मुंबई लखनौ विरूद्धच्या सामन्याआधी पाचव्या स्थानी होती. मात्र विजयानंतर मुंबईने थेट दुसर्या क्रमांकावर उडी घेतली. मुंबईच्या या विजयामुळे दिल्ली कॅपिट्ल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला मोठा झटका लागला. दिल्ली, आरसीबी आणि पंजाब या तिन्ही संघांची एका स्थानाने घसरण झाली. वरील तिन्ही संघ सामन्याआधी अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी होते.
लखनौ विरूद्ध मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयामुळे मुंबईचा नेट रनरेटही चांगलाच वाढला आहे. मुंबईचा नेट रनरेट सामन्याआधी +0.673 असा होता. तर विजयानंतर नेट रनरेट +0.889 असा झाला आहे. मुंबईने लखनौला पराभूत करत या मोसमातला सहावा विजय मिळवला. मुंबई यासह 12 पॉइंट्स मिळवणारी चौथी टीम ठरली. मुंबई व्यतिरिक्त गुजरात, दिल्ली आणि आरसीबी या 3 संघांच्या खात्यातही 12 गुण आहेत.
गुजरातचा इतर 3 संघांच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने ते पहिल्या स्थानी आहेत. तर मुंबई नेट रनरेटमुळेच दिल्ली आणि आरसीबीप्रमाणे सारखे पॉइंट्स असूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली तिसऱ्या आणि आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सची पाचव्या स्थानी घसरण झालीय. तर लखनौ पाचव्या पराभवानंतरही सहाव्या स्थानी कायम आहे.
मुंबईने असं केलं कमबॅक
दरम्यान नियमानुसार, प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 8 विजय अर्थात 16 पॉइंट्स बंधनकारक असतात. आता मुंबई लखनौला पराभूत करत प्लेऑफच्या दिशेने आणखी जवळ येऊन ठेपली आहे. मुंबईला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आणखी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईचा पुढील सामना हा 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.