ढिंग टांग : जंग की तय्यारी..!
esakal April 30, 2025 01:45 PM

दुश्मनाला कधीही कमी लेखू नये. हा रणनीतीतला पहिला नियम आहे. परंतु, तो कौटिल्याने सांगितल्यामुळे भलताच घोळ होऊन बसला. या नियमाची पाकी युद्धतज्ज्ञांना टोटल लागली नाही. परिणामी, युद्धजन्य परिस्थितीची चिकित्सा व मीमांसा व विश्लेषण आणि बरेच काही करताना त्यांनी भारतीय फौजेच्या तयारीला कमी लेखले असावे असे दिसते.

आमच्या हाती खुफिया दस्तावेज लागला आहे. भारताशी युद्ध झालेच तर पाकी सैन्य आरामात जिंकेल, असा दावा दोन शख्स करताना या दस्तावेजात दिसतात. हा जबरदस्त पुरावा आम्ही सूत्रांच्या हवाली केला नाही.

कां की ही सूत्रे महाडांबिस असतात. ती सर्व वृत्तवाहिन्यांना बातम्या पुरवतात. तथापि, खास आमच्या वाचकांसाठी आम्ही हा खुफिया दस्तावेज अंशत: खुला करत आहोत. कानोकान खबर होता कामा नये, हे वाचकांनी समजून असावे.

आका-ए-अतिरेकी, प्रमुख-ए-लष्कर जनाब असीम मुनीरमियां, हिंदोस्तांच्या फौजेला एकवेळ दुरुत्तर करता येईल, पण मीडियावाल्यांना नाही. पाकिस्तान प्रचंड टरकला असून आपल्या मुल्कातील बहुतेक फौजींचा हाजमा ढिला झाल्याची ब्रेकिंग न्यूज हिंदोस्तानी मीडिया दाखवत आहे.

काही मूछवाले जंगबहादूर तिथे पाकिस्तानी आर्मी बोगस असल्याचे सांगत आहेत. मी हा वृत्तांत बघितला नाही, कारण माझा खरोखर हाजमा ठीक नाही. तथापि, असा काही हमला हिंदोस्तांवाल्यांनी केलाच, तर आपण जबाबी हमला करु शकतो ना? तेवढी आपली तय्यारी आहे ना? हे कळवावे. शुक्रिया. आपला शहाबाज शरीफ. वझीरेआझम ए पाकिस्तान.

मेहेरबान वझीरे आजम शहाबाजमियां, आप बिलकुल फिकर न करें. हमारी फौजें सरहद पर बिलकुल चाकचौकन्नी तय्यार है. काही फौजी भाईंनी अचानक तबियत नासाज झाल्याखातिर सिक लीव्ह टाकली आहे, हे सच आहे, पण त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. काही फौजींनी तर थेट राजीनामेच पाठवले आहेत. ’जंग लडने की अब उमर नहीं रही’ अशी वजहा दिली आहे. वोह भी ठीकही है.

आपल्याकडे तीस-चाळीस हजार रणगाडे आहेत. पण त्यातल्या काही रणगाड्यांना जंग न झाल्यामुळे गंज पकडला आहे. काहींची चाके जमिनीत रुतली आहेत. उरलेले रणगाडे चालवायला डिझेलच मिळत नाही. क्या करे? हवाई जहाजसुद्धा भरपूर आहेत, पण ती पुरानी झाली आहेत.

त्यातल्या काही हवाई जहाजांमध्ये आपले हवाई दलाचे सैनिक राहतात! मी इन्स्पेक्शन करायला गेलो तेव्हा काही विमानांच्या पंखांवर बनियान, कच्छे सुखायला टाकलेले बघितले!! लेकिन फिलहाल फिक्र की कोई गुंजाइश तो नही है.

आपल्या सामग्री-ए-जंगमध्ये काही पनडुब्ब्या आणि लढाऊ जहाजे आहेत. पण त्यांच्यात प्रॉब्लेम एवढाच आहे की पनडुब्ब्या तरंगतात, आणि जहाजे बुडतात. ये उल्टा क्यों हो रहा है, इसकी जांच चल रही है. बाकी सब एकदम ओक्के है!!

इंडियावाल्यांना एक चीज अजून मालूम नाही, ती म्हणजे आपल्याकडे अनेक मिसाइल आहेत, आणि वेळ पडली तर अटमबमसुध्दा आहे. मोदी के लोगोंने कुछ कुराफात केली तर आपण हरगिज ही हत्त्यारे इस्तेमाल करु. त्यात प्रॉब्लेम थोडासाच आहे.

मिसाइल जिथे ठेवल्या आहेत, त्या गोडाऊनची चाबी गहाळ झाली आहे. एक एक्सट्रा चाबी तिथल्या पहारेकऱ्याकडे असते. पण तो गेल्या महिन्यात बलुचिस्तानला गेला, तो वापस आलेलाच नाही. बाकी तय्यारी जय्यत झाली आहे.

हम इंडियावालों को जबरदस्त जबाब देगें. जंग लडना कोई हमसे सीखे. शुक्रिया. आपका अपना. असीम मुनीर. प्रमुख ए लष्कर. पाकिस्तान.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.