फलटण : गेली ३० वर्षे संघर्ष करून मी फलटण मतदारसंघात पाणी आणलं. मतं मिळवण्यासाठी नव्हे, तर जनतेसाठी आम्ही कामं केली. मी हे केलं, ते केलं, असं जे विरोधक म्हणतात ना, त्या ९० टक्के कामांचा पाया मी घातलाय. पाया मी घातलाय, कळस लावायला हे पुढे आहेत, असा उपरोधिक टोला आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला.
कुरवली (ता. फलटण) येथे बाणगंगा धरणाच्या जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुरवलीचे सरपंच राहुल तोडकर, बाळासाहेब निंबाळकर, रमेश गोळे यांच्यासह कुरवली, माळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार रामराजे म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांनीही साथ दिल्याने आम्ही शून्यातून राजकारणाची सुरुवात केली होती. त्याहीपेक्षा तुमच्यापुढे जे नेतृत्व तयार होत आहे, ते नेतृत्व तुम्हाला आणि तुमच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. कोणीतरी म्हणतं रामराजेंनी पाण्यासाठी काय केलं? मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की मी पाण्यासाठी काय केलं नाही ते सांगा? एमआयडीसीसाठी काय केलं? कमिन्समध्ये सहा हजार लोक काम करतात, हेच त्याचे उत्तर.
उलट ते कमिन्सला टाळे ठोकायला निघालेत. तुमच्यापुढे जे नेतृत्व तयार होत आहे, ते तुम्हाला आणि तुमच्या पिढीला अजिबात लाभकारक ठरणार नाही. त्यांच्या हातून काहीही विकास होणार नाही. ते फलटणसाठी काहीच करणार नाहीत, काही केलंच तर फलटण सोडून बाहेर करतील. कारण त्यांना दिल्लीला जायचंय.’’
विधानसभेला १०-२० हजारांनी आपल्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला असला तरी राजकारणातील आपला मूलभूत पाया आजही मजबूत आहे. मी हार मानणारा माणूस नाही. काहीही करून जनतेच्या मदतीने बिघडलेली राजकीय परिस्थिती बदलणारच. मोठ्या कष्टाने बसवलेली तालुक्याची घडी विस्कटू देणार नाही, असे रामराजेंनी सांगितले.