Virat Kohli: RCB च्या विजायनंतरही कसोटी क्रिकेटला विसरला नाही विराट; म्हणाला, हा जरी सर्वोत्तम क्षण असला, तरी...
esakal June 04, 2025 08:45 AM

इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. बंगळुरू आयपीएलचे आठवे विजेते ठरले. मंगळवारी (३ जून) झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा विजय खास ठरला, कारण १८ वर्षांपासून ही स्पर्धा खेळणाऱ्या या संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तसेच हा विजय खूप खास ठरला.

विराट एकमेव खेळाडू आहे, जो १८ वर्षे खेळत आहे. त्यामुळे १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विराटने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

विराटने त्याच्या कारकिर्दीत १९ वर्षांखालील वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, टी२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी असे मोठ्या ट्रॉफी जिंकल्या आहे, पण आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यासाठी त्याला १८ वर्षे वाट पाहावी लागली. विराट बंगळुरूच्या विजयानंतर अत्यंत भावूकही झाला होता. त्याला त्याते अश्रुही अनावर झाले.

दरम्यान, विराटने सामन्यानंतर त्याच्या भावनाही व्यक्त केल्या. त्यावेळी त्याने आनंद झाल्याचे व्यक्त केले. त्याने सांगितले त्याने सर्वकाही या संघासाठी दिले आहे. पण याबरोबरच विराट कसोटी क्रिकेटलाही विसरला नाही. त्याने कसोटी क्रिकेट त्याच्यासाठी अजूनही सर्वोत्तम असल्याचे सांगितले. विराटने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

विराट म्हणाला, 'माझ्यासाठी हा क्षण नक्कीच माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे. पण तरीही कसोटी क्रिकेटच्या पाच पायऱ्या खाली तो असेल. जर तुम्हाला आदर कमवायचा असेल, तर कसोटी क्रिकेट खेळा.'

विराट बंगळुरू जिंकल्यानंतर म्हणाला, 'हा क्षण जिकता संघासाठी खास आहे, तितकाच तो चाहत्यांसाठीही आहे. १८ वर्षांची ही प्रतिक्षा होती. मी या संघासाठी माझे तारुण्य आणि माझा सर्वोत्तम काळ दिला आहे. माझ्याकडे जे काही होते, ते सर्वकाही मी दिले आहे.'

'मी कधीही विचार केला नव्हता की हा क्षण माझ्या आयुष्यात येईल. शेवटचा चेंडू पडल्यापासूनच भावना अनावर झाल्या होत्या. एबी डिविलियर्सने या संघासाठी जे काही केले आहे, ते अविश्वसनीय आहे. मी त्याला सामन्याआधीच सांगितले होते की हा विजय जितका माधा आहे, तितकाच तुझा आहे. त्याने आमच्यासोबत सेलीब्रेशन करावं असं मला वाटत होतं. त्याने या संघासाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकलेत. त्यामुळे तो आमच्यासोबत पोडियमवर असण्यासाठी पात्र आहे.'

२०११ ते २०२१ दरम्यान डिविलियर्स बंगळुरूकडून खेळला. तो देखील या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होता.

विराटने पुढे सांगितले, 'मी या संघाशी प्रामणिक आहे. माझं हृदय, माझा आत्मा बंगळुरूसोबत आहे. मी जोपर्यंत आयपीएल खेळत राहिल, तोपर्यंतमला याच संघाकडून खेळायचे आहे. मी आज रात्री लहान बाळासारखा झोपेल.'

तसेच त्याने अखेर हे विजेतेपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याने संघाचे आणि व्यवस्थापनाचेही कौतुक केले. तसेच त्याने सांगितले अनेकांनी लिलावानंतर संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, पण आता ते जिंकले आहेत. हा विजय बंगळुरूसाठी असल्याचेही त्याने सांगितले.

विराट कोहली या हंगामात बंगळुरूकडून सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू होता. त्याने १५ सामन्यांत ६५७ धावा चोपल्या. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ८६६१ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतकांचा आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.