Manoj Jarange Patil: आता माघारी यायचं नाही, पुढचं आमरण उपोषण मुंबईत; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Saam TV April 30, 2025 09:45 PM

Maratha Reservation: 'आतापर्यंत संयमाने घेतली, पण सरकारने १०० टक्के आपली फसवणूक केली.', असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. आता मुंबईत आमरण उपोषण होणार असे म्हणत मनोज जरांगेंनी तारीख देखील सांगितली. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

यांनी सांगितले की, 'प्रथम सरकारचे कौतुक आहे. दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात. संयम तरी किती दिवस धरायचा.'

मनोज जरांगेंनी पुढच्या आंदोलनाची आज घोषणा केली. त्यांनी सांगितले की, '२९ ऑगस्ट २०२५ ला आम्ही जाणार आहोत. मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी २९ ऑगस्टच्या अगोदर कामं आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही.'

तसंच, 'सगे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. पुढील आंदोलनाची दिशा १ ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या पाठ झाल्या आहे. यावर सरकारची पीएचडी झाली आहे. शिंदे समितीने काम केलं. आमच्या नोंदी नाही म्हणले होते. तुम्ही त्या नोंदी शोधल्या त्यामुळे सरकारचे कौतुक केलं. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या. अधिकाऱ्याला काय अडचण आहे. अधिकाऱ्याला आमचा हक्क ना करण्याचा अधिकार काय आहे? जो अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नसेल त्याला तात्काळ निलंबित करून टाका.', अशी मागणी जरांगेंनी केली आहे.

मनोज जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'मराठा आणि कुणबी एकच आहे याचा अध्यादेश काढा. विद्यार्थ्यांनी नेत्यांचा ऐकून शिक्षणात जातीवाद आणू नका. आम्ही जातीवाद करत नाही. सरकारकडे मागणी आहे की सगळे गुन्हे सरसकट मागे घ्या. माझ्यावर हल्ला करायचा. मला मारायचं आहे. आता मी दारात आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या. मी २९ ऑगस्टला तुमच्या दारात येत आहे तुम्हाला जे करायचं ते करा. मला फक्त २८ ला सोडायला पोर येतील २९ ला ते परत जातील. २८ ऑगस्टच्या आधी सगळ्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे. आमच्या संयमाचा अंत बघू नका फडणवीससाहेब.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.