Maharashtra Live Update : ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली
Sarkarnama May 01, 2025 02:45 AM
Sharad Pawar On Uddhav And Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असं शरद पवार यांनी म्हटले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदीर उभारण्यात आले. आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी! निवृत्त मेजर जनरल यांचं मोठं भाकीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसेच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेत लष्कराला फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यावर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य जे काही करेल, ते भयावह असेल आणि कदाचित पाकिस्तानची शकले पडतील. आधीच्या सर्जिकल आणि एअर स्ट्राइक मध्ये "एलिमेंट ऑफ सरप्राईज" होता. मात्र आता पाकिस्तानविरुद्ध आता जो होईल ते सर्जिकल व एयर स्ट्राइकच्या पुढचा असेल, म्हणजेच तो कदाचित अर्ध किंवा पूर्ण युद्ध अशा स्वरूपाचा असेल, अशी शक्यताही निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली.

Jayant Patil On Radhakrishna Vikhe : 'नक्की काय प्रकरण आहे ते बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणे हे योग्य नाही'

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2004 ते 2010 या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या बेसल डोस कर्जाच्या प्रकरणात भाजप मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. नक्की काय प्रकरण आहे ते बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणे हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

Jayant Patil On Pahalgam Attack : 'तीनशे किलोमीटर सरहद ओलांडून अतिरेक्यांनी पहलगामला हल्ला करणे, ही गंभीर बाब'

तीनशे किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद ओलांडून पहलगामला पोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे. आज ते सापडत नाही हा दुसरा गंभीर मुद्दा आहे. भारतावर हल्ला झाला आहे, निष्पाप लोकांवर हल्ला करून जो पळपुटेपणा, घाबरटपणा केलाय, त्याला सडेतोड उत्तर मोदी सरकारनं द्यावं, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar News : 'पहलगामची घटना हा देशावरचा हल्ला', विशेष अधिवेशन बोलवण्याची शरद पवारांची मागणी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 पर्यटकांची हत्या केली. यानंतर आजही संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिवेशन बोलवण्याची मागणी करताना यावर तेथेच बोलणं उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पहलगाममधील हल्ला देशावरचा हल्ला असून धर्म, जात, पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. यामुळे देशवासीय कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यायला हवं असेही आवाहन केलं आहे.

Pahalgam Attack : भारतीय सैन्य दल पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना काही दिवसांत दिसेल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करताय, असं समोर आले आहे. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे. त्याचा थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

Deven Bharti is the new Mumbai Police Commissioner : देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

मुंबईचे पोलिस आयुक्त फणसाळकर आज (बुधवारी) सेवेनिवृत्त झाले. त्यांच्या जागी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बंगाली मुस्लिमांना कल्याण सोडण्याचा इशारा, शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल

कल्याण ग्रामीण मधील उसाटणे आणि खोणी गावालगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करत स्टोल्स टाकणाऱ्या बंगाली मुस्लिमांना मारहाण करत स्टोल्स तोडण्यात आले. तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या मुस्लिमांना त्वरित गाव सोडण्याचा दिला इशारा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी दिला आहे. पाटील यांचा इशारा देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पहलगाम हल्ल्याप्रकरणी गृहमंत्रालयावर कारवाई करा - संजय राऊत

जम्मू-कश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्रालयाची होती. त्यामुळे या हल्ल्यात नुसत्या बैठकी घेऊन उपयोग नाही. आधी पाकिस्तावर हल्ला करा आणि कश्मीरमधील हल्ला रोखण्यास अपयशी ठरलेल्या गृहमंत्रालयावर कारवाई करा, अशी मागणी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

येत्या 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ला करणार - पाकिस्ताना मंत्र्याने व्यक्त केली भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिन्ही लष्करप्रमुखांशी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीनंतर मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तानी माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी पत्रकार परिषद घेत 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तावर हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त केली. हल्लाबाबत आमच्याकडे विश्वसनीय माहिती असल्याचे त्यांनी म्हटले.

Kolkata Hotel Fire : कोलकातामधील हॉटेलला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू

मंगळवारी रात्री कोलकाता येथील फलपट्टी मच्छुआ भागातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अग्निशमन दलाच्या मदतीने 22 जणांना वाचवण्यात आलं आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune News : पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग

पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. या कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची माहिती आहे. दरम्यान, थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे.

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे महत्वाचे आदेश

परभणी येथील संविधान अवमान केल्याच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणात तपासी अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत अंतिम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 मे रोजी होणार आहे.

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठेत आले असता, एक बाईकस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

Justice Bhushan Gavai : न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून गवई यांच्या नावाला परवानगी दिली. त्यानुसार आता ते 14 मे रोजी देशाचे पुढील न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतील.

Radhakrishna vikhe patil : राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.