बचाव आणि आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर भारताने पाकिस्तानला उघडं पाडलं आहे. पाकिस्तानने सलग दोन दिवस भारतावर आक्रमण केलं. पण त्यांना भारताचा अभेद्य बचाव भेदता आला नाही. त्याचवेळी भारतीय मिसाईल्स आणि ड्रोन्सनी पाकिस्तानात जाऊन स्ट्राइक केला. वेळीच हा हल्ला त्यांना रोखता आला नाही. सध्या जे काही सुरु आहे, त्या सगळ्यात पाकिस्तानची पुरती फजिती झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांनी हत्या करुन पाकिस्तानने या सगळ्याची सुरुवात केली. भारताने फक्त या घटनेला जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करुन याचा बदला घेतला. तिथे दहशतवाद्यांना मारलं. नेहमीच दहशतवादाचा पुरस्कर्ता राहिलेल्या पाकिस्तानने या दहशतवाद्यांसाठी म्हणून भारतावर हल्ला केला.
सलग दोन दिवस त्यांनी भारतावर अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या संसदेत खूप हास्यास्पद वक्तव्य केलं आहे. “भारताने जो ड्रोन हल्ला केला, तो आमचं लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे आमची जागा शोधण्यासाठी केला होता. ही टेक्निकल गोष्ट आहे. मी समजावू शकत नाही. म्हणून या ड्रोन्सना आम्ही रोखलं नाही, अन्यथा आमचं लोकेशन कळलं असतं” असं ख्वाजा आसिफ पाकिस्तानी संसदेत म्हणाले.
ट्रोलिंगसाठी एक विषय दिला
भारताने कालपासून पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त ड्रोन्स पाडले आहेत. हल्ला करायला आलेल्या शत्रूला तुम्ही धडा शिकवाल की त्याला हल्ला करु द्याल. कदाचित पाकिस्तान वेगळा विचार करत असावा. मूळात पाकिस्तानकडे भारताच्या ड्रोन हल्ल्याला रोखणारे तंत्रज्ञानच नाहीय. पाकिस्तानची हीच हतबलता ख्वाजा आसिफ जाहीरपणे सांगू शकत नाहीत. म्हणून त्यांनी स्वत:च्या ट्रोलिंगसाठी एक विषय दिला आहे.
अख्ख्या पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याने हादरवलं
भारताच्या S-400 आणि अन्य एअर डिफेन्स प्रणालीने पाकिस्तानचा आतापर्यंतचा हल्ला असफल ठरवला आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर गुरुवारी सकाळी भारताने अख्ख्या पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याने हादरवून सोडलं. नेमकं करायच काय? हेच पाकिस्तानला कळत नाहीय.