मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. दुभंगलेले मने, दोन भाऊ आणि पक्ष एकत्र येत असतील तर हरकत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय हालचालींचे सूतोवाच केले.
मात्र यावर इतक्यात वक्तव्य करणे योग्य नसून काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल, असे ते म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले,‘‘काँग्रेस पक्ष भाजपविरोधात लढत आहे, शरद पवार हे इंडिया आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. काही राजकीय घटना घडली तर त्यानंतर भूमिका घेता येईल.’
काँग्रेस पक्ष ‘भारत जोडो’चा विचार घेऊन पुढे जात आहे, लोकशाही व राज्यघटनेचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्याबरोबर काँग्रेस असेल, असे सपकाळ म्हणाले.