भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचे वेध लागले आहेत. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण स्थिती कमी झाल्यानंतर आता लवकरच उर्वरित 16 सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआय येत्या काही दिवसांमध्ये नवं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 किंवा 18 मे पर्यंत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा झटका लागला आहे. आरसीबीने या हंगामात अप्रतिम कामगिरी केलीय. त्यामुळे आरसीबी प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे 9 मे रोजी आयपीएलचा 18 वा मोसम आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला. मात्र आता पुन्हा सर्व काही सुरळीत होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असताना दुसऱ्या बाजूला मात्र आरसीबीची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आरसीबीचा मॅचविनर गोलंदाज जोश हेझलवूड याला उर्वरित सामन्यांना दुखापतीमुळे मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
जोश हेझलवूड दुखापतीचा शिकार
जोश हेझलवूड याला खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात जोश या हंगामातून बाहेर झालाय, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जोश भारत-पाकिस्तान तणावानंतर मायदेशी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. मात्र जोशने खांद्याच्या दुखापतीमुळे खेळता येणार नसल्याचं टीम मॅनेजमेंटला सांगितंलय. जोश हेझलवूड काही आठवड्यात पूर्णपणे फिट होऊ शकतो. जोश दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपर्यंत फिट होईल, अशी शक्यता आहे.
जोशने आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी केली. जोशने आरसीबीच्या विजयात अमूल्य योगदान दिलं. आरसीबीने 11 पैकी 8 सामने जिंकले. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 16 पॉइंट्स आहेत. जोशने या हंगामातील 10 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली.
दरम्यान आयपीएल 2025 स्थगित होण्याआधी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत गुजरात आणि चेन्नईचे गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि नूर अहमद हे दोघे प्रत्येकी 20-20 विकेट्ससह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी होते. तर जोश सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होता. मात्र जोश प्लेऑफच्या तोंडावर निर्णायक वेळी दुखापतीमुळे खेळणार नसल्याने आरसीबीचं नशिबच फुटकं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.