पाकिस्तानने भारताच्या वेगवेगळ्या शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्यापेक्षा दुप्पट मोठा हल्ला पाकिस्तानवर चढवला. भारताने 9 आणि 10 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानातील वेगवेगळ्या एअर बेसेसना लक्ष्य केलं. पाकिस्तानी एअर फोर्सचे आठ ते नऊ एअर बेस भारताने उडवून दिले. अगदी सरगोदापर्यंत खोलवर हा एअर स्ट्राइक केला. भारताने किराणा हिल्सवर हल्ला केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. आज DGMO च्या पत्रकार परिषदेत त्या संबंधी एका पत्रकाराने एअर मार्शल एके भारती यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी खूप गमतीशीर उत्तर दिलं.
सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, पाकिस्तानी अणवस्त्रांच स्टोरेज सेंटर असलेल्या किराणा हिल्सवर आपण एअर स्ट्राइक केला तसच सरगोदा येथे सुद्धा लीकेज झाल्याची चर्चा आहे, असं विचारलं. त्यावर एअर मार्शल एके भारती म्हणाले, “थँक्यू माहिती दिल्याबद्दल. किराणा हिल्स येथे पाकिस्तानाच अणवस्त्र साठ्याच तळ आहे, हे आम्हाला माहित नव्हतं. पण आम्ही अशा कुठल्या ठिकाणी हल्ला केलेला नाही”
भारताची अभेद्य एअर डिफेन्स सिस्टिम
एके भारती यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भारताच्या अभेद्य हवाई सुरक्षा कवचाबद्दल माहिती दिली. “भारताकडे अनेक थरांची एक मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आहे. खालच्या थराची एअर डिफेन्स सिस्टिम, शोल्डर गन, शॉर्ट रेंज जमिनीवरुन हवेत मारा करणारी, लॉन्ग रेंज क्षेपणास्त्र आमच्या ताफ्यात आहेत” असं एके भारती यांनी सांगितलं. “पाकिस्तानचा ड्रोन्स, क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमानाद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला” असं एके भारती यांनी सांगितलं. “पिचोरा, एएलडी गन्स या जुन्या सिस्टिमसह स्वदेशी बनवाटची आकाश सिस्टिम यांनी उत्तम परफॉर्म केलं. मागच्या आठवड्यात आम्ही या सिस्टिमद्वापरे यश मिळवलं” अशी एअर फोर्सने माहिती दिली