भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे आयपीएलचा 18 वा मोसम (IPL 2025) स्थगित करण्यात आलेला. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले विदेशी खेळाडू मायदेशी परतले. आता सर्व परिस्थितीत बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानंतर बीसीसीआयकडून आयपीएल 2025 चं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्याला 17 मे पासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी प्लेऑफच्या शर्यतीत असणार्या आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला टेन्शन होतं. कारण, मॅचविनर बॉलर जोश हेझलवूड याच्या खेळण्याबाबत निश्चितता नव्हती. दोन्ही देशातील तणावाची स्थिती आणि दुखापत यामुळे जोशला आयपीएल 2025 मधील उर्वरित सामन्यांना मुकाव लागणार असल्याची अधिक शक्यता होती. मात्र आता जोश हेझलवूड खेळणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कर्णधार रजत पाटीदार याच्यासह संपूर्ण आरसीबी टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतातील परिस्थितीनंतर अनेक खेळाडू हे मायदेशी परतले. ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंनीही भारत सोडलं आणि घरी रवाना झाले. मात्र त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे मायदेशी परतलेले खेळाडू पुन्हा परतणार की नाही? अशी चर्चा रंगली होती. तसेच दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या निर्णयाला आमचा पाठींबा असेल, असं जाहीर केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला जोश हेझलवूड याला खांद्याच्या दुखापतीचा त्रास जाणवत होता. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला होणार आहे. त्यामुळे जोश भारतात परतणार नसल्याचं जवळपास निश्चित होतं.
मात्र आता जोश उर्वरित सामन्यांसाठी आरसीबीसह जोडला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र जोश केव्हा परतणार? आरसीबीसह पुन्हा केव्हा जोडला जाणार? याबाबत कोणतीही अपडेट नाही. मात्र जोश परतणार असल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण जोश बॉलिंगच ग्रुपचं नेतृत्वत करतोय. जोशने हा हंगामात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलीय.