तुल्बुल प्रकल्प पूर्ण होण्याची मागणी वेग वाढवते
Marathi May 20, 2025 09:24 AM

पाकिस्तानमुळे रोखावे लागले होते काम : 38 वर्षांनी प्रत्युत्तर देण्याची संधी

श्रीनगर:

सिंधू जल करार स्थगित करण्यात आल्याने उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला, बांदीपोरा आणि दक्षिण काश्मीरमधील श्रीनगर, अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम येथील शेतकरी आनंदी झाले आहेत. 38 वर्षांनी भारताला तुलबुल धरणाचे काम सुरू करण्याची संधी मिळाल्याचे त्यांचे सांगणे आहे. भारताने या प्रकल्पाचे काम 1984 मध्ये सुरू केले होते. या प्रकल्पामुळे दक्षिण ते उत्तर काश्मीरपर्यंत 100 किलोमीटचा नौवहन कॉरिडॉर निर्माण होणार असून काश्मीरची जीवनरेषा झेलमचे पात्र कधीच कोरडं पडणार नाही. एक लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. 1987 मध्ये पाकिस्तानने या प्रकल्पामुळे कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत काम रोखण्यास भाग पाडले होते.

सिंधू जल करार स्थगित झाल्याने तुलबुल प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावा, यामुळे हिवाळ्यात देखील 24 तास वीजपुरवठा शक्य असल्याचे संकेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहे. उत्तर काश्मीरमध्ये तुलबल प्रकल्पाचे काम 1980 च्या दशकात सुरू करण्यात आले होते. परंतु सिंधू जल कराराचा दाखला देत पाकिस्ताने दबाव आणल्याने हे काम सोडून देण्यात आले होते. आता सिंधू जल करार तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आला आहे, अशास्थितीत आम्ही हा प्रकल्प पुन्हा सुरु करू शकतो. या प्रकल्पामुळे वाहतुकीसाठी झेलमचा वापर करण्याच्या अनुमतीचा लाभ मिळेल. तसेच विद्युतनिर्मितीतही वाढ होणार असल्याचा दावा ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

महबूबा यांचा विरोध

पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी ओमर अब्दुल्लांच्या मागणीला गंभीर आणि चिथावणीपूर्ण ठरविले. भारत-पाकिस्तान यांच्यात अलिकडेच युद्धसदृश स्थिती निर्माण झाली होती आणि काश्मीरला याची सर्वाधिक किंमत मोजावी लागली, निर्दोष लोकांना जीव गमवावा लागला. अशास्थितीत अशाप्रकारचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. पाण्यासारख्या आवश्यक गोष्टीचा शस्त्राप्रमाणे वापर करणे अमानवीय आणि धोकादायक असल्याचा इशारा त्यांनी दिला.

वुलर सरोवराच्या क्षेत्रात तुलबुल प्रकल्प

तुलबुल प्रकल्प झेलम नदीच्या वुलर सरोवराच्या तोंडावर 440 फूट लांब नौवहन लॉक-कम नियंत्रण संरचना स्वरुपाचा होता. येथे झेलमचे पाणी रोखण्यासाठी 3 लाख अब्ज क्यूबिक मीटरची भांडारण क्षमता तयार करण्यात आली होती. तुलबुल प्रकल्पासाठी त्यावेळी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, परंतु झेलममध्ये वारंवार पूर आल्याने बांधकाम गाळात बुडाले. यामुळे झेलमचे पाणी काश्मीरमध्ये रोखता आले नाही आणि ते वाहून पाकिस्तानात जात राहिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.