पनवेलमध्ये ८० इमारती धोकादायक
esakal May 23, 2025 01:45 AM

पनवेल, ता. २२ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे प्रभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रभाग समिती अ - १८, प्रभाग समिती ब- १५, प्रभाग समिती क - १०, प्रभाग समिती ड- ३७ अशा एकूण ८० धोकादायक इमारती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने संबंधित इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या सदनिका रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ८० धोकादायक इमारती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा इमारतींतील नागरिकांनी तातडीने स्थलांतर करण्याबाबत महापालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी सूचना दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालय, तसेच राज्य सरकारने धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्यानुसार मूळ मालक, भोगवटादार यांना पुरेशी संधी देऊनही संबंधितांनी इमारत रिक्त करून पाडण्याची कार्यवाही केली नाही, तर या इमारतींचा विद्युतपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करणे, त्यानंतर या इमारती पोलिसांमार्फत निर्मनुष्य करून त्या पाडण्याची कार्यवाही महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
------------------
सर्व जबाबदारी घरमालक, भाडेकरूची
धोकादायक इमारत मालकांनी स्वतःहून सुरक्षितरित्या पाडण्याची कार्यवाही करावी. धोकादायक इमारत कोसळून काही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित व वित्तहानी झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या संबंधित नागरिकांची, तसेच इमारतीचे मालक व भाडेकरू यांची राहील. त्याचप्रमाणे अतिधोकादायक मालमत्तांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची जबाबदारी संबंधित घरमालक किंवा भोगवटादार यांची राहणार आहे. याकरिता महापालिका जबाबदार राहणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे कळवण्यात आले आहे.
------------------
संकेतस्थळावर इमारतींची माहिती
धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संपूर्ण माहिती www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच नागरिकांनी आपल्या आसपास धोकादायक इमारती असतील, तर त्याची माहिती नजीकच्या प्रभाग अधिकाऱ्यांना द्यावी. जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये राहू नये व दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
-------------------------
टोल फ्री क्रमांक
अधिक माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०००९ वर तसेच ०२२-७४५८०४०/४१/४२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.