RCB तुम्ही IPL जेतेपदासाठी पात्र होता! सचिनपासून कुंबळेपर्यंत आजी-माजी खेळाडूंकडू कौतुक; विजय मल्ल्याचेही ट्वीट चर्चेत
esakal June 04, 2025 03:45 PM

मंगळवारी (३ जून) १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं स्वप्न सत्यात उतरलं. रजत पाटिदारच्या नेतृत्वात बंगळुरूने आयपीएल २०२५ पर्वाची ट्रॉफी उंचावली. संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक बंगळुरूने मारली होती.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले. या विजयानंतर जगभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अनेक आजी - माजी क्रिकेटपटूंनी, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनीही बंगळुरूचे कौतुक केले आहे.

बंगळुरूचा कर्णधार सांगितले की हे विजेतेपद विराट कोहलीसाठी आहे. विराट गेली १८ हंगाम बंगळुरूकडून खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक मोठे विजेतेपद जिंकले, पण हे एकमेव विजेतेपद त्याच्याकडे नव्हते. पण आता तो आयपीएल विजेता देखील ठरला आहे. बंगळुरूच्या या विजेतेपदाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटचे मित्र, संघसहकारी आणि बंगळुरूचे माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल हे देखील सामील झाले होते.

बंगळुरूच्या या विजयाचे कौतुक करताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पोस्ट केले की 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तुमचं पहिल्या आयपीएल विजेतेपदाबद्दल अभिनंदन. १८ व्या पर्वाची ट्रॉफी १८ क्रमांकाच्या जर्सीच्या खेळाडू उचलणे, हा एक सुंदर संयोग आहे. चांगले खेळलात आणि तुम्ही विजेतेपदासाठी पात्र होता. पंजाब किंग्स तुम्ही सुद्धा खूप चांगले खेळलात. तुम्हीही या हंगामात चांगली लढत दिली.'

इरफान पठाणने १८ वर्षांची प्रतिक्षा संपली, असं ट्वीट केलं आहे. बंगळुरूचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही विशेष पोस्ट केली आहे.

बंगळुरूचा माजी कर्णधार अनिल कुंबळेनेही पोस्ट करत लिहिले, 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अफलातून आयपीएल विजेतेपदासाठी अभिनंदन. दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर तुम्ही खरोखर यासाठी पात्र होता. पंजाब किंग्सकडूनही संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी झाली. ए साला कप नामदू.'

शिखर धवनने लिहिले, 'ए साला कप नामदे, अखेर सत्यात उतरलं. आरसीही तुम्ही या विजयासाठी पात्र होता. १८ वर्षांनंतर या संघाने आयपीएलची ट्रॉफी उंचावली. सर्व चढ-उतारांनंतर हा अविश्वसनीय हंगाम राहिला. पंजाब किंग्सचं दुर्दैव, त्यांनी सर्वकाही दिलं, पण आजची रात्र आरसीबीची होती.' याशिवाय देखील अनेकांनी पोस्ट केल्या आहेत.

विजय मल्ल्याचेही ट्वीट चर्चेत

बंगळुरू संघाचे माजी मालक विजय मल्ल्यानीही संघाच्या विजेतेपदानंतर खास ट्वीट केले आहे. मल्ल्याने लिहिले, 'आरसीबी अखेर १८ वर्षांनी आयपीएल चॅम्पियन्स झाले. २०२५ पर्वातील मोहिम अफलातून राहिली. संघात समतोल होता, कोचिंग आणि सपोर्ट स्टाफही चांगला होता. खूप खूप अभिनंदन.

यानंतर मल्ल्यानी आणखी एक ट्वीट करत विराट कोहली, एबी डिविलियर्स, ख्रिस गेल यांना आरसीबी संघात घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

मल्ल्याने पोस्ट केली की 'जेव्हा मी आरसीबीची स्थापना केली, तेव्हा माझं स्वप्न होतं की आयपीएल ट्रॉफी बंगळुरूमध्ये यायला हवी. मला त्यावेळी तरुण असलेल्या दिग्गज विराट कोहलीची निवड करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे जो सलग १८ वर्षे आरसीबीसोबत राहिला.'

'याशिवाय युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर ३६० एबी डिविलियर्स यांचीही निवड करण्याचा मला सन्मान प्राप्त झाला, हे आरसीबीच्या इतिहासातील अविभाज्य भाग राहिले. अखेर आयपीएलची ट्रॉफी बंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आरसीबीचे चाहतेही खरंच सर्वोत्तम आहेत, ते या विजेतेपदासाठी पात्र होते. यावेळी कप बंगळुरूत आलाय'

बंगळुरूचा विजय

अंतिम सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १९० धावा केल्या होत्या. पण त्यानंतर १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकात ७ बाद १८४ धावाच करता आल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.