आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ वैशाख कृ. दशमी.आजचा वार : ॐ बुधाय नम:
आजचा सुविचार : पर्बतों से आज मैं टकरा गया, तुमने दी आवाज, लो मैं आ गया..!………..
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले दोन दिवस पर्बतों से आज मैं टकरा गयाऽऽ..हेच गाणे (सुप्रसिध्द गायक शब्बीरकुमार ऊर्फ गरीबांचे रफीसाहेब) गुणगुणतो आहे. आमचे परममित्र छगनबाप्पा भुजबळसाहेब हे शपथविधीला राजभवनात आले, तेव्हापासून हेच गाणे आठवते आहे. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आमचे छगनबाप्पा परत आले. मी पुन्हा येणार नाही, असे म्हणत म्हणत आले!!
इडली खायला उडप्याकडे आरामात डुलत डुलत जावे, तस्से आले! ‘अण्णा, मेंदूवडा कितना ठंडा लाया? सांबार तो गरम लानेका!’ असे गल्ल्यावरच्या शेठऱ्याला वाजवून बिलाची चिंता न करता नाश्ता करुन बडिशेप चघळत निघून जावे, तितक्या सहजतेने आले तस्से गेलेसुद्धा!! खरे सांगतो, मला त्यांचा हेवा वाटला…
मागल्या खेपेला ते माझ्याकडे आले होते, तेव्हा ‘काही दिवस थांबा’ असे मी त्यांना सांगितले होते. त्यांनी ‘हॅ’ असे म्हणून बात उडवून लावली होती. महिना पंधरा दिवसांपूर्वी मी दादासाहेब बारामतीकरांकडे विषय काढला होता. त्यांच्याकडली (पक्षी : राष्ट्रवादीची) एक जागा मंत्रिमंडळात रिक्त असून ती भरण्यासाठी योग्य कँडिडेट मिळतोय का? अशी आठवण मी करुन दिली.
‘‘हे बघा, मनात आणलं तर मी दोन मिंटात जागा भरीन. पण तुमच्या मनात जी व्यक्ती आहे, ती यायला काचकूच करतेय नाऽऽ..,’’ दादासाहेब डोळे गरागरा फिरवत म्हणाले. मी च्याटंच्याट पडलो! ‘‘माझ्या मनात कोण व्यक्ती आहे बुवा?’’ मी अचंब्याने विचारले.
‘‘तुम्हाला सांगली चांगली वाटतेय, पण ते काम अवघड आहे! मनातल्या मनात हो म्हणायलासुद्धा ते तीन-चार वर्षं टाइम घेतात, ऐका माझं!’’ दादासाहेबांनी बजावले. सांगली म्हटल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ओह! हे जयंत्रावांच्या संभाव्य करेक्ट कार्यक्रमाबद्दल बोलतायत वाटतं!!
‘‘छे हो, माझ्या मनात तसं काही नाही!’’ मी घाईघाईने खुलासा केला. शेवटी थर्ड अंपायर गाठावा, असा विचार करुन आम्ही आमचे मित्र कर्मवीर भाईसाहेब (मु.पो. ठाणे) यांना भेटलो. त्यांना चांगला सल्ला विचारायला गेलो तर त्यांनी दिल्लीला फोन लावला!
शेवटी बाजी मारली छगनबाप्पांनीच! आपल्याशिवाय काही पर्यायच नाही, हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते. इतके की, त्यांना निर्णय कळवण्यासाठी फोन केला तर ते बहुधा फोनशीच बसून होते. फोन उचलून म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी दहा वाजता? आलोच!’’ ते आले तेच मुळी ‘तुमने दी आवाज लो मैं आ गया’ हे गाणे गुणगुणत!
…मला काही बोलावेच लागले नाही. कुणालाच काही बोलावे लागले नाही. नव्या मंत्र्याचा शपथविधी आहे, येवढ्या एका ओळीच्या प्रसिद्धिपत्रकाच्या जोरावर मीडियावाल्यांनीही ‘भुजबळसाहेबांची वापसी’ ही ब्रेकिंग न्यूज दिवसभर चालवली. तेही एक बरेच झाले! कारण ‘नव्या मंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार’ अशा बातम्या आल्या असत्या तर पंचाइत झाली असती. कारण छगनबाप्पांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर आमच्या मुनगंटीवारसाहेबांचा फोन आलाच! म्हणाले, ‘‘मीसुध्दा यायचंय का?’’ मी त्यांनाही ‘थोडे थांबा’ असे म्हणून फोन ठेवला.
तात्पर्य : शपथविधी पहाटेचा असो की दुपारचा! त्याचे टेन्शन असतेच!! एकाचा शपथविधी हा दुसऱ्याचा मनोभंग असतो.