ठाणे - राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ‘लालपरी’चा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार आता एसटी बसमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘ॲडास’ सुरक्षा प्रणाली बसविण्यात येणार आहे.
ठाणे-नागपूर मार्गावर धावणाऱ्या ‘लालपरी’मध्ये बसवण्यात आलेल्या सुरक्षा प्रणालीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह एसटीचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘एकात्मिक सुरक्षा प्रणाली’ नव्या एसटी बसमध्ये लावण्यात येणार आहे.
चालकाच्या बस चालविण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्यापासून ते प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणालीदेखील बसविण्यात येणार आहे. या सुरक्षा उपकरणांमुळे महिलांनादेखील एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित करता येणार आहे.
अशी आहे ‘ॲडास’ प्रणाली...
ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीममुळे (ॲडास) चालकाला संभाव्य अपघात, रस्ता ओलांडणारे पादचारी, लेन बदल केल्यास इशारा दिला जातो.
सतत बस चालविल्यामुळे चालकाला डुलकी आल्यास किंवा लक्ष विचलित झाल्यास ही प्रणाली लगेच सतर्क करते.
बसमध्ये बसविण्यात आलेल्या चार ब्लाइंड स्पॉट कॅमेऱ्यामुळे चालकाला बस ३६० अंशांत पाहता येते.
‘स्मार्टबस’ची वैशिष्ट्ये..
व्हिडिओ निरीक्षणासाठी प्रवासी कक्षात दोन, समोर आणि मागे प्रत्येकी एक कॅमेरा
प्रवासी मोजणी सेन्सर
कॅमेऱ्याच्या दृश्यांसह चालकासाठी साहाय्य स्क्रीन
फोर जी आणि जीपीएस ट्रॅकिंग व स्टोरेजसह मोबाइल एनव्हीआर प्रणाली
जाहिराती आणि मार्ग प्रदर्शनासाठी तीन एलसीडी स्क्रीन
बसमध्ये सूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. सरनाईक यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री