कोल्हापूर : मॉन्सनपूर्व पाऊस (Pre-monsoon Rain) जास्त आहे. याचा आठ दिवस आधी अंदाज व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा संप मिटवून शेतीच्या नुसकसानीचे पंचनामे सरकारने करणे आवश्यक होते; पण असे झाले नाही. सरकार सत्तेच्या वाटपात गुंतले आहे. कृषिमंत्री (Agriculture Minister) शेतीच्या बांधावर गेलेले पाहिले नाही, अशी टिका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार (Satej Patil) यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, ‘राज्यात पावसाचा आठ दिवस अलर्ट होता. यावेळी कृषी सहायकांचा संप होता. मात्र, त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर कृषी विभागाच्या (Agriculture Department) मागण्या मान्य केल्या, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारच्या भावना काय आहेत, हे यातून समोर आले. मॉन्सूनपूर्व पावसामुळे सर्व उन्हाळी पिके वाहून गेली. त्याचे तातडीने पंचनामे करून मदत मिळाली पाहिजे. शासन याबाबत गंभीर नव्हते हे सिद्ध झाले.
पाणी भरलेल्या शेतांमधील पिके आठ दिवसांनी कुजणार आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करावेत. अंशतः पडलेल्या घरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना घर पडलेल्या इतकीच नुकसानभरपाई द्या.’ सतेज पाटील म्हणाले, ‘आलमट्टीसंदर्भात परवा बैठक झाली. मात्र, विरोधातल्या एकाही आमदाराला बोलावले नाही. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी महाविकास आघाडीचे आमदार सरकारला म्हणणे देणार आहोत.
सर्वपक्षीय बैठक कोल्हापूरमध्ये घेणार आहोत, असे सांगण्यात येत आहे. हा विषय राजकारणाचा नाही हे आता सरकारच्या लक्षात येत आहे. वडनेरे समितीचा अहवाल सरकारने का नाकारला, ते आधी जाहीर करावे. जागतिक बँकेच्या आराखड्यातून महापूर नियंत्रण होईल, असे वाटत नाही. येथील पाणी दुसरीकडे नेणे हे आम्हाला मान्य नाही. हे पाणी कसे आणि कोठून नेणार, हे आधी स्पष्ट करावे.’
शेतीचे मोठे नुकसानखासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘जिल्ह्यात शंभर वर्षांत असा पाऊस पडलेला पाहिला नाही. मी नुकताच राधानगरी येथे पाहणी करून आलो. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.’
सत्यजित तांबेचे विधान चुकीचेआमदार सतेज पाटील म्हणाले, ‘सत्यजित तांबे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. आम्ही फोन केला आणि वेळ मिळाली नाही, असे कधी झाले नाही. २० वर्षांचा माझा अनुभव आहे. कोणाला फोन केल्यावर ‘कोणाला कोणाची वेळ मिळते.’ या राजकारणात आम्हाला जायचे नाही.’