नागपूरच्या महिलेनं कारगिलमधून नियंत्रण रेषा पार ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार नेमकाच समोर आला. या महिलेला अमृतसर पोलिसांकडे सोपवण्यात आलंआहे.
त्यानंतर नागपूर पोलिसांनी महिलेला नागपुरात आणण्याची तयारी सुरू केली. बुधवारी रात्री उशिरा या महिलेला नागपुरात आणलं जाणार होतं.
सध्या हेरगिरीच्या अनेक प्रकरणांची चर्चा सुरू असल्यामुळं या महिलेच्या प्रकरणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही महिला नेमकी कोण आहे आणि ती कधी बेपत्ता झाली होती? तसंच नेमकं काय घडलं? ती पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती कशी मिळाली? याबाबत जाणून घेवूयात.
नेमकं प्रकरण काय?सुनिता जामगडे असं सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या या 43 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती 4 मे रोजी आठवीत शिकणाऱ्या मुलाला घेऊन घरातून निघाली होती.
अमृतसरला जात असल्याचं महिलेनं कुटुंबीयांना सांगितलं होतं. पण ही महिला मुलासह कारगिलला पोहोचली होती.
कारगिलमध्ये मुलासह महिलेनं एका हॉटेलमध्ये चेक-इन केलं. पण त्यानंतर मात्र मुलाला तिथं एकटं सोडून महिला तिथून निघून गेली.
त्यानंतर हॉटेलमधील लोकांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं. हॉटेलमध्ये पर्यटक आले होते. तेव्तिािामुलाला एकटं ठेवून महिला बेपत्ता झाल्याचं कारगिल पोलिसांना समजलं.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही महिला नागपूरची असल्याची माहिती तिच्या आधार कार्डवरून मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मुलाकडंही चौकशी केली. तसंच महिलेच्या नागपुरातील नातेवाईकांना फोन करूनही माहिती घेण्यात आली.
शेवटी महिला नागपूरची असल्याची खातरजमा झाल्यानंतर कारगिल पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला.
कारगिल सीमेवरील हंदरमन गावातही महिलेचा शोध घेण्यात आला. पण महिला कुठेही सापडली नाही. शेवटी पोलिसांनी बेपत्ता असल्याचा एफआयआर नोंदवला.
त्यानंतर मुलाला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती, कारगिलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनी दिली.
आधीही पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्नया महिलेचा तपास सुरू असतानाच तिनं पाकिस्तानची सीमा ओलांडली की नाही याचा पोलीस शोध घेत होते. त्याचवेळी चौकशी दरम्यान अमृतसर पोलिसांकडून काही माहिती मिलाली.
या महिलेनं यापूर्वीही पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला असल्या पोलिसांना आमृतसर पोलिसांकडून समजलं.
एप्रिल महिन्यामध्ये या महिलेनं वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं.
या प्रकारानंतर ही महिला पुन्हा नागपुरात परतली. त्यावेळीही तिला कारगीलमधल्याच हंदरमन गावातून सीमा पार करायची होती, अशीही माहिती मिळाली आहे.
पण, त्यावेळी सोनमर्गपासूनचा मार्ग पूर्णपणे बंद असतो. त्यामुळं या महिलेनं वाघा - अटारी सीमेवरून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानने केले भारताकडे सुपूर्दया महिलेचा गेल्यावेळी केलेला प्रयत्न फसल्यानंतर ती आता पुन्हा कारगिलमध्ये आली. यावेळी ती सीमा ओलांडून पाकिस्तानात जाण्यात यशस्वीदेखील झाली.
त्यानंतर पाकिस्ताननं दोन दिवसांपूर्वी या महिलेला पाकिस्तानमधून भारताकडे सोपवलं अशी माहिती अमृतसर पोलिसांनी दिली आहे.
या महिलेला आता नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं जात आहे, अशी माहितीही वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनी दिली.
हेरगिरीच्या अँगलने तपास करणारसंबंधित महिला नागपुरातील कपिल नगर भागातील रहिवासी आहे. मुलाला घेऊन ती आईच्या घरी राहायची.
नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये ही महिला परिचारिका म्हणून काम करत होती. ती मूळची नागपूरची असल्यानं नागपूर पोलिसही या प्रकरणी तपास करत आहेत.
कपिल नगर पोलिसांचं पथक महिलेला नागपुरात आणण्यासाठी अमृतसरला गेलं होतं. बुधवारी रात्री उशिराते महिलेसह नागपुरात पोहोचणार होते.
अमृतसर पोलिसांनी नोंदवलेला झिरो एफआयआर इकडे वर्ग करून महिलेची चौकशी केली जाणार आहे.
महिलेनं भारताबाबतची काही गुप्त माहिती पाकिस्तानला दिली होती का? महिला पाकिस्तानात कोणाला भेटायला गेली होती? तिनं नियंत्रण रेषा का पार केली? ती हेरगिरी करत होती का? अशा सगळ्या दृष्टीनं तपास करणार असल्याचं झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
तसंच अमृतसर पोलिसांनी या महिलेचा मोबाईल तपासला त्यावेळी त्यामध्ये पाकिस्तानी नागरिकासोबत काही चॅटींग आढळून आल्याची माहितीही देण्यात आली आहे.
या महिलेचे तिकडे काही संबंध होते का? यादृष्टीनं देखील आम्ही तपास करत आहेत असं पोलिसांनी सांगितलं.
कारगिल पोलिसही ताब्यात घेणारनागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारगिल पोलीसदेखील महिलेला ताब्यात घेणार आहेत. त्यांच्याकडूनही महिलेची चौकशी केली जाणार आहे.
महिला पाकिस्तानात जाण्यामागे तिचा नेमका काय उद्देश होता? तिनं काही गुप्त माहिती तिकडे पुरवली का? याचा तपास पोलीस करतील.
तसेच पोलिसांना काही गुप्त माहिती मिळाल्याचंही समोर आलं आहे. त्यादृष्टीनं या महिलेचा तपास केला जाणार आहे, असं कारगिलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनी सांगितलं.
या सगळ्या प्रकरणाबद्दल आम्ही सुनिता जामगडे या महिलेच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण 'बोलण्याच्या मानसिकतेत नाही', असं म्हणत भाऊ सुनील जामगडे यांनी बोलण्यास नकार दिला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)