बदलापूरकरांचा आता मेट्रोने हायस्पीड प्रवास
निविदा प्रसिद्ध; देशातील सर्वाधिक लांबीची मार्गिका
बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : लोकलचे धक्के खात प्रवास करणाऱ्या बदलापूरकरांना आता हायस्पीड मेट्रोने प्रवास करता येणार आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग या देशातील सगळ्यात मोठ्या ३९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेला सरकारची मंजुरी मिळाली आहे. या कामासंबंधीची निविदा वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बदलापूरकरांचा मुंबईचा लोकलने होत असलेला जीवघेणा प्रवास आता सुखकर होणार आहे.
बदलापूर ते कांजूरमार्ग ही देशातील सर्वाधिक लांबीची मेट्रो मार्गिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकसित होणार आहे. यासाठी निविदा काढली असून, हे काम पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आव्हान एमएमआरडीएने स्वीकारले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे व भाजप ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रोसेवा महायुतीच्या सरकारने मंजूर केली असून, त्याचा मोठा फायदा हा बदलापूरकरांना होणार असल्याचे सांगितले.
जवळपास पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या बदलापूर शहरात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दीड ते पावणेदोन लाख इतकी आहे. त्यात रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे होत असलेली गर्दी जीवघेणी ठरत आहे. यावर पर्याय म्हणून लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. एकीकडे तिसरी चौथी रेल्वे मार्गिका जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न निकाली निघणार नाही. यासाठी प्रयत्न होत असतानाच बदलापूरकरांचा बदलापूर ते मुंबई हायस्पीडने प्रवास होण्यासाठी मेट्रोला मंजुरी मिळाली आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग असा ३९ किमी लांबीचा प्रवास बदलापूरकरांना हायस्पीडने करता येणार आहे. यासाठी बदलापूरला मेट्रो कारशेड होणार आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग यादरम्यान १५ मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत.
मेट्रोची निविदा काढली असून, एमएमआरडीएच्या सहभागीदारीने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून स्वारस्य मागवले आहे. २८ जुलै ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. पुढे निविदांची छाननी होऊन प्रत्यक्ष प्रस्ताव मागितले जातील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी या मेट्रो मार्गिकेसाठी आमदार किसन कथोरे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे बदलापूर पूर्वेकडील शहराध्यक्ष रमेश सोळसे, अण्णा कुलकर्णी व इतर अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेट्रोची स्थानके
मेट्रो बदलापूर, पालेगाव, अंबरनाथ, निळजे, शिळफाटा, महापे, घणसोली या ठिकाणाहून पुढे जात ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग या ठिकाणी ही मेट्रो पोहोचेल. या संपूर्ण स्थानकादरम्यान एकूण १५ मेट्रो स्थानके होणार आहेत.
प्रवास होणार सुखकर
मेट्रोच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे बदलापूरकरांचा रोजचा प्रवास सुखकर होणार आहे. या मेट्रोवर एकूण १५ स्थानके असून, ही मेट्रो थेट मुंबईला जोडली जाणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, भिवंडी ही सगळी शहरे बदलापूर शहराशी जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो-१४ ही वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो-४, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो-६, असे करून कांजूरमार्ग रेल्वेस्थानक आणि इतर तीन ठिकाणे इंटरचेंज करून जोडली जाणार आहेत.