नाशिक- ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची योग्यता इतकी व्यापक आहे, की त्यांना एक नव्हे, तर चार भारतरत्न मिळाले तरीही ते थोडेच ठरतील,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले. भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिरासमोर आयोजित तेजोमयी हिंदुत्व व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित या तीनदिवसीय व्याख्यानमालेचा समारोप बुधवारी (ता. २८) झाला. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सरचिटणीस दिनकर पाटील, तसेच ज्येष्ठ पदाधिकारी सलीम शेख आणि अरुण नेवासकर उपस्थित होते.
शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध पैलूंनी उजळणी केली. ते म्हणाले, ‘सावरकरांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्याचीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराची कल्पना मांडली. कवीहृदय असलेल्या सावरकरांना परिस्थितीने क्रांतिकारी बनवले. अनेक क्रांतिकारकांचा प्रेरणास्रोत हे सावरकरच होते.’
त्यांनी स्पष्ट केले, की मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरेसारख्या युवकांनी सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली. त्यानंतर सावरकरांना अमानुष छळ सहन करावा लागला. पण त्यांच्यावर ‘माफीवीर’ असल्याचे आणि फक्त ६० रुपयांची पेन्शन घेत असल्याचे खोटे आरोप केले जातात. जर ते तुरुंगातच राहिले असते, तर त्यांना फाशी देण्यात आली असती. जिवंत राहून देशासाठी कार्य करणे हाच त्यांचा खरा हेतू होता,’ असे पोंक्षे यांनी ठामपणे सांगितले. शरद पोंक्षे यांच्या प्रभावी भाषणाने व्याख्यानमालेचा समारोप तेजस्वी झाला आणि उपस्थितांमध्ये देशभक्तीचा नवा उत्साह संचारला.
नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व
पोंक्षे यांनी नाशिकच्या क्रांतिकारी इतिहासालाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहून पाठविलेल्या पिस्तुलातून अनंत कान्हेरे यांनी नाशिकमधील दामोदर थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या घटनेनंतर सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांना अटक झाली. या क्रांतीमुळे नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले.