रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासह त्यांच्या चाहत्यांना आता पहिल्या आयपीएल विजेतेपदाची स्वप्न पडत असतील. बंगळुरू संघाची इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेत कामगिरीही तशी झाली आहे.
बंगळुरू संघ आयपीएल २०२५ मध्ये अंतिम सामन्यात पोहचणारा पहिला संघ ठरला आहे. गुरुवारी मुल्लनपूरमध्ये बंगळुरूने क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
अंतिम सामन्यात पोहचण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २००९, २०११ आणि २०१६ साली बंगळुरूने आयपीएलमध्ये अंतिम सामना खेळला आहे. पण अद्याप बंगळुरूला आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यामुळे आता ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात बंगळुरू ही प्रतिक्षा संपवण्यासाठी उत्सुक असतील.
क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला बंगळुरूसमोर केवळ १०२ धावांचे लक्ष्य ठेवता आले होते. या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १० षटकातच २ विकेट्स गमावत पूर्ण केला. बंगळुरूकडून फिल सॉल्टने (५६) नाबाद अर्धशतक झळकावलं.
त्याआधी बंगळुरूच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करताना पंजाबला १४.१ षटकातच १०१ धावांवर रोखलं.सुयश शर्मा आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
या विजयानंतर बंगळुरूचा कर्णधार संघाचे विशेषकत: सुयश शर्माचे कौतुक करताना म्हटले, 'मला वाटतं आम्ही आमच्या योजनांबाबत खूप स्पष्ट होतो की आम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे. मला वाटतं वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला वापर केला. सुयश शर्माने ज्याप्रकारे विकेट्स घेतल्या, त्याने त्याची दिशा आणि टप्पा योग्य राखला होता, जी खूप चांगली गोष्ट आहे. '
'कर्णधार म्हणून मला त्याच्या गोलंदाजीबाबत पूर्ण स्पष्टता आहे. त्याने स्पम्पवर गोलंदाजी करायला हवी, हीच त्याची ताकद आहे. त्याची गुगली समजणं फलंदाजांसाठी कठीण आहे. मला त्याला त्याच्या गोलंदाजीबाबतही स्पष्ट कल्पना द्यायची आहे, मला त्याला गोंधळात टाकायचे नाही. मग त्याने या प्रक्रियेत काही धावा खर्च केल्या, तरी हरकत नाही. आम्ही या स्पर्धेत खूप सराव केला आहे, त्यामुळे एखाद्या दिवशी सराव न करण्याचा फार फरक पडत नाही.'
फिल सॉल्टचेही कौतुक रजतने केले. तो म्हणाला, 'त्याने बऱ्याच सामन्यात ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, ज्याप्रकारे संघाला सुरुवात दिली आहे, मी त्याचा मोठा चाहता झालो. त्याला डगआऊटमधून पाहाणे शानदार असते. '
रजतने बंगळुरूच्या चाहत्यांनाही खास मेसेज दिला आहे. तो म्हणाला, 'मी नेहमीच बंगळुरूच्या चाहत्यांप्रती कृतज्ञ आहे. फक्त चिन्नास्वामीच नाही, तर जिथेही आम्ही जातो, तिथे आम्हाला घरचं मैदान असल्यासारखं त्यांच्यामुळे जाणवतं. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला पाठिंबा देत राहा. अजून एक सामना आणि मग एकत्र सेलीब्रेशन करू.'
बंगळुरू संघ आता ३ जून रोजी अंतिम सामना खेळेल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.