काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे आहेत. त्यांनी या दौऱ्यात पाकिस्तानसह चीनचा बुरखा फाडला. दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूरची माहिती त्यांनी दिली. ते एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे ते नेतृत्व करत आहे. पाकिस्तानचे 81 टक्के संरक्षण उपकरणं ही चीनमधून येतात. संरक्षण हा उदार शब्द असल्याचे ते म्हणाले. पाक स्वसंरक्षणासाठी नाही तर इतर देशांवर हल्ला करण्यासाठी या शस्त्रांचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानमध्ये चीनचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा सुरू आहे. तो चीनला दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील एका बंदराला जोडतो. या रस्त्यामुळे चीनमधील माल जगापर्यंत आणि तर कच्चा माल चीनपर्यंत वेगाने पोहचतो. आम्हाला याची माहिती आहे. पण आमची लढाई ही दहशतवादी आणि त्याला प्रोत्साहन देणार्या शक्तीविरोधात असल्याचे त्यांनी ठणकावले.
कोलंबियाला सांगितली सत्य स्थिती
कोलंबियाला भारताची भूमिका समजली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यावेळी कोलंबियाने दहशतवादांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता. यावर शशी थरूर यांनी मत व्यक्त केले. भारताची भूमिका कोलंबिया या देशाला समजावून सांगितली. भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जे देश दहशतवादी आणि दहशतवादाला आश्रय देतात, ते असे करणार नाहीत, असा चिमटा सुद्धा त्यांनी काढला. पाकिस्तानविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही संघटना मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबा यांची एक शाखा आहे.
पाकड्यांचा बुरखा फाडला
दहशतवाद आणि त्याला विरोध करणारे यांच्यात साम्य कसे असेल? असा सवाल शशी थरूर यांनी केला. दहशतवादी हल्ला करणारे आणि आपली सुरक्षा करणारे एका तराजूत तोलले जाऊ शकत नाही. आम्ही केवळ आत्मसंरक्षणासाठी आपल्या अधिकाराचा वापर केला. जर याविषयी अजूनही काही लोकांच्या मनात संदेह असेल तर आम्ही दूर करू असे थरूर म्हणाले. कोलंबिया सरकारकडे पाकिस्तान आणि पीओकेची सध्य परिस्थिती, या भागातील दहशतवादी अड्ड्यांविषयीची माहिती आम्ही देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. थरूर यांच्या नेतृत्वाखाली गुयाना, पनामा, कोलंबिया, अमेरिका आणि ब्राझील या देशांच्या दौऱ्यावर भारतीय शिष्टमंडळ गेले आहे.