तांब्याच्या बाटलीतून पाणी किती वेळा प्यावं? अनेकजण करतात ही चूक
GH News May 30, 2025 05:10 PM

आजच्या घडीला मानवी जीवनात प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्या कालबाह्य होत चालल्या आहेत. ऑनलाइन शॉपिंग साइट्स उघडताच तुम्हाला तांब्याच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या विविध प्रकारच्या बाटल्या दिसतील. तांब्याच्या बाटल्या, तांब्याचे ग्लास, आणि वेगवेगळ्या डिझाईनचे तांब्याचे कप सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत आणि त्यांची किंमतसुद्धा काहीशी जास्त आहे. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांच्या तुलनेत लोक जास्त महागात तांब्याच्या किंवा स्टीलच्या बाटल्या विकत घेत आहेत.

विशेषतः तांब्यापासून बनवलेल्या भांड्यांची मागणी अधिक आहे. कारण पुन्हा एकदा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची ‘फॅशन’ किंवा प्रवृत्ती वाढली आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते, असा अनेकांचा विश्वास आहे. पण ही सवय खरंच किती आरोग्यदायी आहे? याविषयी आहारतज्ज्ञ ल्यूक कोटिन्हो यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

प्राचीन सवय

ल्यूक हे आहारतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनर आणि लाईफस्टाइल कोच आहेत. अनुष्का शर्मापासून मनोज बाजपेयी आणि आमिर खानसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. विशेषतः आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटासाठी केलेला शारीरिक बदल ल्यूक यांच्या सल्ल्यानुसार केला होता. ल्यूक सांगतात की, एकेकाळी आपल्या आजी-आजोबांना तांब्याच्या ग्लासमधून पाणी पितांना पाहिलं जायचं. प्राचीन भारतात तांब्याची भांडी खूप वापरात होती.

तांब्याच्या ग्लासमध्ये रात्री पाणी ठेवून सकाळी ते पिण्याची परंपरा होती. यामुळे शरीर निरोगी राहत असे आणि पचनशक्तीही सुधारायची. तांबे मेटाबॉलिक रेट वाढवतो, हे नक्कीच. मात्र, याचा फायदा किती होतो हे तुम्ही ते कसे आणि किती वेळा वापरता यावर अवलंबून असते.

झालं उलटंच

पूर्वी तांब्याची भांडी वापरली जात होती पण दिवसातून एकदोन वेळाच तांब्याच्या ग्लासमधून पाणी प्यायलं जात होतं. बाकी वेळ मातीच्या भांड्यात किंवा हंडीत पाणी ठेवून ते प्यायले जात होते. फिल्टर नसतानाच्या काळात पाणी मातीच्या मडकीत भरून ठेवले जायचे आणि नंतर तांब्याच्या ग्लासमध्ये ओतून प्यायले जायचे. पण आज उलटं होतंय – तांब्याच्या फायद्यांचा विचार करून लोक संपूर्ण दिवसभर तांब्याच्या बाटलीत पाणी भरून ठेवतात. परिणामी, शरीरात जास्त प्रमाणात तांबे जातो आणि त्यामुळे विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.

तर हा त्रास होईल

तांबे थायरॉईडची समस्या कमी करू शकतो. पण जर तुम्ही दिवसभर फक्त तांब्याच्या ग्लास किंवा बाटलीतूनच पाणी पित असाल तर शरीरातील कॉपरची मात्रा वाढते. यामुळे थायरॉईड ग्रंथीला नुकसान होऊ शकते. तांबे हृदय आरोग्य राखण्यासाठी, हाडं मजबूत करण्यासाठी, आणि रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. पण त्याचप्रमाणे जर शरीरात खूप जास्त तांबे मिसळला गेला तर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. पचन सुधारण्याऐवजी अपचन होऊ शकते. पोट फुगणे, उलट्या होणे, चक्कर येणे, अशा तक्रारी वाढू शकतात. पचनसंस्थेत संसर्ग होण्याची शक्यताही वाढते. तांब्याच्या बाटलीत लिंबूपाणी, गरम पाणी किंवा डिटॉक्स ड्रिंक्स ठेवले तर पोटाचे त्रास होऊ शकतात, असं आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दिवसातून एकदाच तांब्याच्या ग्लासातून…

तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायचं असेल, तर प्रमाण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. शरीरात जर जास्त प्रमाणात तांबे गेला, तर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. काही वेळा लोक अनाहुत चुका करतात आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, हृदयरोग, किंवा मूत्रपिंडाचा त्रास असेल तर तांब्याच्या बाटलीचा वापर सावधपणे करावा. दिवसातून एकदाच तांब्याच्या ग्लासमधून पाणी प्यायला हरकत नाही, पण संपूर्ण दिवस तांब्याच्या बाटलीतून पाणी पिल्यास शरीराला नुकसान होऊ शकते, असंही आहार तज्ज्ञ सांगतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.