मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अशामध्ये गुरुवारपासून पावसाने काही जिल्ह्यांमध्ये ब्रेक घेतला असला तरीही आगामी काळात मुसळधार तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शुक्रवारपासून (30 मे) राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाऐवजी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. (Weather Update in Maharashtra heavy rainfall with wind in some districts in state)
हेही वाचा : Palghar News: पावसाळ्यापूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या ठिकाणी पावसाने ब्रेक घेतला आहे. पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी उष्णतेची झळ बसत आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबई आणि कोकणात तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी केव्हा तरी मधून अधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांचे तर उकाड्यामुळे पुन्हा हाल होऊ लागले आहे. घामांच्या धारामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पण, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पश्चिम महाराष्ट्रातून विश्रांती घेतली आहे. शुक्रवारीदेखील पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी फक्त रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात काल 7.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून अंतः घटलेले पुण्याचे कमाल तापमान पुन्हा 32 अंश सेल्सिअस इतके वाढणार आहे. पुढील 24 तासात पुण्यातील आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.