पारदर्शकता असलेले निर्मळ नाते!
esakal May 31, 2025 11:45 AM

विजया बाबर आणि आनंद प्रभू

कलाक्षेत्रात लोक एकत्र काम करतात, पण त्या माध्यमातून निर्माण होणारी मैत्री काळाच्या ओघात विस्मरणात जाते. मात्र काही वेळा मैत्री अशी असते, की ती काळासोबत अधिक घट्ट होत जाते. अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता आनंद प्रभू यांची मैत्री हे त्याचे सुंदर उदाहरण आहे. एका मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारताना त्यांची ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचा प्रवास आजही छान सुरू आहे. हे दोघे सध्या ‘झी मराठी’वरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकत आहेत. विजया ‘कमळी’ या मालिकेतून लवकरच पुन्हा दिसणार आहे. व्यावसायिक आयुष्यात व्यग्र असताना त्यांनी मैत्री प्रामाणिकपणे जपली आहे.

विजया सांगते, ‘‘मी आणि आनंद एका मालिकेत काम करत होतो तेव्हा आमचे बहुतांश सीन्स एकत्र असायचे. जवळपास अडीच वर्षे ही मालिका चालली. त्यामुळे आमच्यातील मैत्रीचा धागा मजबूत झाला. मालिका संपल्यावरही मैत्रीचे नाते अजून जिवंत आहे. आम्ही एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड्स’ झालो. आमच्यात वयाचे अंतर खूप आहे. पण ते मैत्रीच्या आड आले नाही.’’

आनंद सांगतो, ‘‘मैत्रीची सुरुवात कधी झाली, हे खऱ्या मैत्रीत सांगणे फार कठीण आहे! आमचा स्वभाव खूप सारखा आहे. दोघांनाही विनोद करायला खूप आवडते आणि आमचा ‘ह्यूमर’ एकमेकांना समजतो. त्यामुळे आमचे खूप पटले आणि एक छान बंध निर्माण झाला. इतका मजबूत, की नुसते एकमेकांकडे बघितले, तरी काय बोलायचे आणि डोक्यात काय चाललेय हे समजते. मग आम्ही ‘बेक्कार’ हसायला लागतो!’’

विजया आनंदबद्दल किती कौतुक वाटते, ते सांगते. ‘‘तो खूप समंजस आहे आणि कधी कोणाला दुखावत नाही. त्याच्यात खूप ऊर्जा आहे. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीत सकारात्मकता आहे. आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली, तरी तो सकारात्मक राहतो. अगदी त्याच्या नावासारखाच सतत आनंदी असतो! आमचे खूप मजेदार किस्से आहेत. एकदा आम्ही एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नृत्य केले, धमाल केली. नाचताना आनंदच्या गुडघ्याला दुखापत झाली. रात्री दोन वाजता हॉस्पिटलमध्ये जावे लागले. तरी आम्ही मजाच करत होतो, जोक्स मारत होतो! हे आमच्या मैत्रीचे वेगळेपण! आनंद ‘फ्रँक’ आहे, बिनधास्त आहे. आमच्यात पारदर्शकता आहे आणि हेच खऱ्या मैत्रीचे लक्षण आहे.’’

आनंदही विजयाचे गुण सांगतो. ‘‘विजयाच्या स्वभावातली मला आवडणारी गोष्ट म्हणजे तिचा मेहनतीपणा. ती नेमक्या ठिकाणी मेहनत करते आणि तिला त्याचे योग्य फळ मिळते. मी तिच्या व्यक्तिमत्त्वातला बदल अगदी जवळून पाहिला आहे. तिचा दुसरा गुण म्हणजे संयम. एखादी गोष्ट खटकली, तरी ती पटकन प्रतिक्रिया देत नाही. ती जशी आहे तशी आहे! कोणता दिखावा नाही. तिला खरेपणा आवडतो आणि ती समोरच्यांकडूनही तशीच अपेक्षा करते. मैत्री म्हणजे तरी काय?... तर आपण समोरच्यापुढे जसे आहोत तसे राहणे! माझे आणि विजयाचे नाते तसेच आहे.’’

(शब्दांकन : मयूरी महेंद्र गावडे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.