आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफ टप्पा शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या क्वालिफायर-2 च्या सामन्याकडे लागल्या आहेत. अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सची भिडत पंजाब किंग्सशी होणार आहे. हा सामना फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ उद्या करो या मरोच्या स्थितीत असणार आहेत. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याची भिडत अंतिम सामन्यात थेट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर -1 मध्ये पंजाब किंग्सला पराभूत केलं होतं. असं असलं तरी उद्या अहमदाबादेत पाऊस पडला आणि क्वालिफायर-2 सामना रद्द झाला तर अंतिम सामन्यात कोणता संघ खेळेल? काय आहे गणित? तेच जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2025च्या प्लेऑफ फॉर्मेटच्या नुसार, लीग स्टेजच्या शेवटी टॉप चार संघ प्लेऑफमध्ये जातात. टॉप दोन संघ (पंजाब किंग्स आणि आरसीबी) क्वालिफायर-1मध्ये लढतात. त्यातील विजेता थेट फायनलमध्ये जातो. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ (गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स) एलिमिनेटरमध्ये खेळतात. त्यातील विजेता क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेल्या संघाशी क्वालिफायर-2मध्ये खेळतो. क्वालिफायर-2 च्या विजेत्याची फायनलमध्ये क्वालिफायर-1च्या विजेत्याशी लढत होते. या सीजनमध्ये पंजाब किंग्सने लीग स्टेजमध्ये 21 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर आरसीबीने 21 गुण घेऊन दुसरं स्थान मिळवलं आहे. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत करून क्वालिफायर-2 मध्ये स्थान मिळवलं आहे.
आयपीएलच्या नियमानुसार, जर क्वालिफायर-2 चा सामना पाऊस किंवा इतर कारणांमुळे रद्द झाला आणि रिझर्व्ह डेच्या दिवशीही सामना खेळवणं शक्य नसेल तर लीग स्टेजमध्ये चांगली रँकिंग असलेला संघ फायनलमध्ये खेळेल. असं झाल्यास पंजाब किंग्स अंतिम सामन्यात खेळेल. कारण पंजाब किंग्सने लीगल स्टेजमध्ये 21 गुण मिळवले आहेत. तसेच त्यांचा नेट रन रेट (+0.376) असून पंजाब किंग्स पहिल्या स्थानावर होता. त्यामुळे पंजाब किंग्सला फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. याचा अर्थ असा की पंजाब किंग्ज अंतिम सामन्यात आरसीबीसोबत खेळेल. असं झाल्यास अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये खेळला जाणारा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशावेळी कोणत्याही स्थितीत या सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राखीव दिवस (रिजर्व डे) ठेवण्यात आला आहे. जर सामन्याच्या दिवशी संपूर्ण खेळ होऊ शकला नाही, तर दुसऱ्या दिवशीही सामना खेळवला जाईल. राखीव दिवशी सामना तिथूनच सुरू होईल जिथे थांबवण्यात आला होता. मात्र, सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 5-5 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे.