Bharatsheth Gogawale : गेल्या अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय. अन्य जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले असले तरी या पदासाठी होत असलेल्या चढाओढीमुळे हे दोन्ही जिल्हे अद्याप पोरकेच राहिले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते तथा राज्यमंत्री योगेश कदम यांनी भर सभेत याच विषयावर भाषण करून पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाच्या मुद्द्याला हवा दिली आहे.
भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत योगेश कदम यांनी भाषण केले. आपल्या याच भाषणादरम्यान त्यांनी रायगडचे पालकमंत्रिपद हे भरतशेठ गोगावले यांना मिळायला हवे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. तसेच मी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिफारस केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या जाहीर भाष्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे आणि भरतसेठ गोगावले यांच्यात नव्याने पालकमंत्रिपदासाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे.
आमची देखील इच्छा होती की भरतशेठ हे पालकमंत्री झाले पाहिजे. भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाच्या रुपात भेट द्या असे एकनाथ शिंदे यांना मी सूचवले आहे. रामदास कदम यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहितीही योगेश कदम यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांनाच दिले पाहिजे, अशी मोठी मागणी योगेश कदम यांनी केली.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी भरतशेठ गोगावले आणि सुनिल तटकरे यांच्यात चढाओढ रंगली आहे. सुनिल तटकरे आपली कन्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळावे यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावताना दिसत आहेत. तर भरतशेठ गोगावले हेदेखील पालकमंत्रिपदासाठी पूर्ण राजकीय वजन वापरत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र चढाओढीच्या राजकाराणामुळे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या सरकारने परत घेतल्या होत्या. सुरुवातीला रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्यात आली होती. मात्र यावर भरतसेठ गोगावले यांनी आक्षेप घेतला होता. सध्या या जिल्ह्याला कोणताही पालकमंत्री नाही.