भारत आणि जपान यांच्या संयुक्त सहकार्याने बांधल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत जपानमध्ये प्रथमच शिंकानसेन बुलेट ट्रेनची (Bullet Train) चाचणी सुरू झाली आहे. ही चाचणी भारतीय गरजा लक्षात घेऊन केली जात आहे, म्हणजेच जेव्हा या गाड्या भारतात येतील तेव्हा त्या स्थानिक वातावरणातही चांगली कामगिरी करू शकतील. हा प्रकल्प 2026 पर्यंत भारतात राबवला जाणार आहे आणि पहिल्या दोन गाड्या जपानकडून भारताला भेट म्हणून दिल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.
जपानची भारतासाठी भेट
या प्रकल्पांतर्गत, भारताला शिंकानसेन मालिकेतील E5 आणि E3 मॉडेलच्या दोन ट्रेन मिळतील. या गाड्या ताशी 320 किलोमीटर वेगाने धावू शकतात. सध्या, जपानमध्ये या गाड्यांची चाचणी सुरू आहे. ट्रेनची क्षमता, सुरक्षितता, तापमान आणि धूळ प्रतिरोधकता यासारख्या ट्रेनच्या अनेक वैशिष्ट्यांची चाचणी केली जात आहे. 2026 या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या गाड्या भारतात येतील तेव्हा येथील जमीन आणि हवामानानुसार त्यांची चाचणी देखील केली जाईल.
Make in India ला मिळणार चालना
जपान टाइम्सच्या रिपोरेटनुसार, या ट्रायलमधून जो डेटा मिळेल, त्याचा उपयोग भारतातच नव्या पिढीच्या E10 सीरिजमधील बुलेट ट्रेन बनवण्यासाठी केला जाईल. यामुळे “मेक इन इंडिया” ( Make in India) उपक्रमांतर्गत टेक्निकल ट्रान्सफर आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळेल.
2 तास 7 मिनिटांत पार पडणार प्रवास
या 508 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये, मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त 2 तास 07 मिनिटांत पूर्ण होईल. या मार्गावर 12 स्थानके असतील, ज्यामध्ये ठाणे, विरार, वापी, सुरत आणि वडोदरा या शहरांचा समावेश आहे. 2016 मध्ये भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कराराचा हा प्रकल्प एक भाग आहे, ज्यामध्ये जपान स्वस्त येन कर्जाच्या स्वरूपात 80 टक्के खर्च देत आहे.
रेल्वेचे चित्र बदलेल
या प्रकल्पामुळे केवळ जलद प्रवासाचेच साधन मिळणार नाही तर रोजगार, पर्यटन, तांत्रिक विकास आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे. एकदा बुलेट ट्रेन सुरू झाली की, भारतातील रेल्वेचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असे बोलले जात आहे.