CM Devendra Fadnavis : पालखी सोहळ्यातील अडचणी दूर करा; रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
esakal May 31, 2025 03:45 PM

जायकवाडी : श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला ४२५ वर्षांची परंपरा आहे. सोहळ्यात ४५ दिंड्या असून ३५ ते ४० हजार वारकरी सहभागी होतात. पालखी सोहळ्यातील अडचणी सोडविण्याची मागणी नाथवंशज रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ मे रोजी मुंबईत निवेदन दिले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात ‘निर्मल वारी’ योजनेंतर्गत विशेष आर्थिक तरतुदीसाठी एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा समावेश करावा, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी किमान दोनशे फिरती शौचालये उपलब्ध करावीत, २००९ पासून पालखी सोहळ्याबरोबर आरोग्य पथकासोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक बंद आहे.

ती पूर्ववत करावी, पंढरपूरला जाताना व परतीच्या प्रवासात आरोग्यसेवा, पाणीपुरवठा करावा, पालखीच्या प्रत्येक मुक्कामास्थळी जमीन अधिग्रहित अथवा आरक्षित करून पालखी तळासाठी जागा मिळावी, चारही रिंगणांच्या ठिकाणी रिंगणासाठी जागा आरक्षित करावी, पालखी सोहळ्यासोबत पैठण-पंढरपूर-पैठण पूर्णवेळ संभाजीनगर जिल्ह्याच्या व्हॅनसहित पोलिस बंदोबस्त मिळावा, प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दीत पोलिस संरक्षण मिळावे आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

५५ मानकऱ्यांना हवा प्रवेश

हा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ५५ मानकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठल मंदिरात प्रवेशाची मागणी असतानाही केवळ पाच व्यक्तींना प्रवेश दिला जातो. त्यामुळे भानुदास महाराजांचा समाधी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी प्रतिवर्षी आषाढ शुद्ध १४ (श्री भानुदास चतुर्दशी) या दिवशी पूर्वपरंपरेप्रमाणे श्री पांडुरंगास व भानुदास महाराज समाधीस नैवेद्य दाखवण्यासाठी ५५ मानकऱ्यांच्या दिंडीसह पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश देण्यात यावा, अशीही मागणी या निवेदनात आहे.

पालखी मार्गाचे काम पूर्ण व्हावे

पैठण येथून प्रस्थान झाल्यावर पहिलाच मुक्काम चनकवाडी येथे असतो. तेथील गोदावरीवरील बंधाऱ्याचा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे नदीपात्रातून पलीकडे जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी पूल उभारावा, चनकवाडी ते पाटेगाव रस्ता पालखी महामार्ग ‘एनएच ७५२ ई’ ला जोडावा, श्री संत एकनाथ महाराज पालखी महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पालखी महामार्गाचे काम मार्गी लावावे, अशी मागणीही नाथवंशज रघुनाथबुवा महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.