नवी दिल्ली : मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशभरात तब्बल ६.३६ लाख कोटी रुपयांचे बॅक गैरव्यवहार झाल्याचा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केला. सरकारच्या नसानसांमध्ये भ्रष्टाचार भिनला असल्याचा टोलाही खर्गे यांनी लगावला.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप सरकार अस्तित्वात आले होते. मोदी सरकारचा हा तिसरा कार्यकाळ असून २६ मे रोजी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर खर्गे यांनी सरकारवर कोरडे ओढले.
खर्गे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात ६,३६,९९२ कोटी रुपयांचे बॅंक गैरव्यवहार झाले. ही वाढ तब्बल ४१६ टक्क्यांची आहे. नोटाबंदीनंतरही मागील वर्षांमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या देखील २९१ टक्क्यांनी वाढली आहे.
पंतप्रधान मोदींच्या धमन्यांमध्ये, नसांमध्ये काय आहे हे ठाऊक नाही. परंतु सरकारच्या नसांमध्ये भ्रष्टाचार आणि बनावटपणा नक्कीच आहे, असा चिमटा खर्गे यांनी काढला. याआधी रमेश यांनी म्हटले होते की मोदी सरकारने मोठमोठ्या घोषणांना पोकळ घोषणा बनविले आणि ‘अच्छे दिन’ हे भीषण स्वप्नासारखे झाले. बेरोजगारी, दुप्पट उत्पन्नाच्या प्रतीक्षेत शेतकरी, महिला आरक्षणावर अटीशर्ती, महागाई, बाजारातील घटती मागणी यावरून हल्लाबोल करताना रमेश यांनी सरकारवर टीका केली होती.