बीएसएफने दिलेल्या झटक्यातून पाक सावरणे अवघड : शाह
वृत्तसंस्था/ पुंछ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चालू महिन्याच्या प्रारंभी पाकिस्तानी आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिल्याप्रकरणी बीएसएफचे कौतुक केले आहे. जम्मू सीमेवर प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत पाकिस्तानच्या 118 हून अधिक चौक्या नष्ट झाल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान बीएसएफने शत्रूच्या नेटवर्कला उद्ध्वस्त केले, जो पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. याची भरपाई करण्यास पाकिस्तानला अनेक वर्षे लागतील, असे शाह यांनी म्हटले आहे. सुरक्षास्थिती, अमरनाथ यात्रेची तयारीची समीक्षा करणे आणि पाकिस्तानी गोळीबाराच्या पीडितांशी चर्चा करण्यासाठी शाह हे जम्मू क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत.
पाकिस्तानने आमच्या सीमा आणि नागरी क्षेत्रांवर हल्ला करून आमच्या दहशतवादविरोधी मोहिमेला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु बीएसएफच्या जम्मू फ्रंटियरच्या जवानांनी पाकिस्तानच्या 118 हून अधिक चौक्या नष्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या टेहळणी प्रणालीचे तुकडे-तुकडे करून नष्ट केले. अशाप्रकारची प्रणाली पुन्हा उभी करण्यास पाकिस्तानला चार ते पाच वर्षे लागणार आहेत. बीएसएफच्या महासंचालकांकडून प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानच्या संचार प्रणाली आणि टेहळणी उपकरणांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तान दीर्घकाळापर्यंत पूर्ण माहिती आधारित युद्ध लढण्यास असमर्थ ठरणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.बीएसएफच्या गुप्तचर माहितीमुळेच अचूक पूर्व-कारवाई शक्य ठरली. बीएसएफच्या अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर अचूक प्रत्युत्तरादाखलची रणनीति पूर्वीच तयार करण्यात आली होती. तसेच योग्यवेळी ती यशस्वीपणे लागू करण्यात आल्याचे वक्तव्य शाह यांनी केले.
मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी
पाकिस्तानने धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्य लोकांवर हल्ले केले, पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबाच्या सदस्याला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. ही सरकारी नोकरी किंवा भरपाई संबंधिताच्या जीवनात झालेली हानी भरून काढू शकत नाही, परंतु हे भारत सरकार, जम्मू-काश्मीर सरकार आणि देशाच्या जनतेच्या भावनांचे प्रतीक असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. पहलगाममध्ये निर्दोष नागरिकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. तर दहशतवाद विरोधातील पंतप्रधान मोदींच्या धोरणाच्या अंतर्गत आम्ही 7 मे रोजी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांना नष्ट केले आहे असे शाह यांनी म्हटले आहे.
भारतीय सैन्याचे कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानने आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, आम्ही पाकिस्तानात घुसून प्रत्युत्त दिले असल्याचे शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे बोलताना म्हटले आहे. यावेळी त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला भ्याड होता, तर भारतीय सैन्याने दहशतवाद विरोधात केलेली कारवाई कौतुकास्पद होती असे उद्गार काढले आहेत.