Sanjay Raut claimed that the Mahayuti government will give Rs 11.50 to women through the Ladki Bahin Yojna
Marathi May 31, 2025 06:26 PM


महायुती सरकार उद्या फूल ना फुलाची पाकळी म्हणून सव्वाअकरा रुपये बहिणींना देतील. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत किती जागा लढवणार, याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

जळगाव : लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. कारण महायुती सरकार प्रत्येक गरीब महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये पाठवले. मात्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. जे अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विरोधक टीका करताना दिसत आहेत. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की, महायुती सरकार उद्या फूल ना फुलाची पाकळी म्हणून सव्वाअकरा रुपये बहिणींना देतील. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हणत खिल्ली उडवली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत किती जागा लढवणार, याबाबतही त्यांनी माहिती दिली. (Sanjay Raut claimed that the Mahayuti government will give Rs 11.50 to women through the Ladki Bahin Yojna)

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज (31 मे) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यापासून संजय राऊत यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी सांगितले की, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांवेळी काय झालं यात न पडता आता आगामी महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आमचे संघटन मजबूत आहे, पण विधानसभा निवडणुका त्यांनी कशा जिंकल्या, हे सर्व जगाला  आता समजले आहे. त्यांना लोकशाही मार्गाने विजय मिळाला नाही. खरं तर त्यांनी निवडणुका जिंकल्या यावर त्यांचा स्वतःचा आणि जनतेचाही विश्वास नाही. त्यामुळे याआधी काय झालं, याचा विचार करण्याऐवजी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

हेही वाचा – Thackeray Vs BJP : भाजपाला ‘चंदा’ देणाऱ्यांचा धंदा जोरात, ठाकरे यांचे टीकास्त्र

स्थानिक स्वराज्य संस्थंच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला आव्हानात्म असतील का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेसाठी आव्हाने ही नवी गोष्ट नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही अनेक आव्हानांचा सामना केला आहे. कारण फक्त निवडणुका लढणे आणि जिंकणे हेच राजकीय पक्षांचे उद्दीष्ट्य नसते. संघटनेच्या माध्यमातून जनतेची आणि राज्याची सेवा करणे हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे. निवडणुका येतात आणि जातात, मात्र जे कार्य हातात घेतले आहे, ते सोडायचे नसते. पण भाजपा आणि मित्रपक्ष नेहमी निवडणुकीच्याच विचारात असतात. पंतप्रधान मोदींना तर देशात काय सुरू आहे, याची माहिती देखील नाही. ते सिंदूर यात्रा करून त्यांचा प्रचार करत आहेत. मात्र असे काम शिवसेना कधीही करणार नाही. कारण आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

बहिणींना सव्वाअकरा रुपये देतील

स्थानिक स्वराज्य संस्थंच्या निवडणुकीत किती जागा लढवणार? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, राज्यातील 27 महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढायच्या आहेत. काही ठिकाणी काँग्रेसची, काही ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाची आणि काही ठिकाणी आमची (शिवसेना ठाकरे) ताकद मजबूत आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार आहोत. कारण या सरकारने जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत मते मिळवली आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता अजित पवार यांनी आपण अशी घोषणा केलीच नाही, असे सांगून हात झटकत आहेत. त्यामुळे आता आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल. कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे त्यांचे आश्वासनही कागदावरच आहे. आता ते 500 रुपयांपर्यंत आले आहेत. उद्या फूल ना फुलाची पाकळी म्हणून सव्वाअकरा रुपये सुद्धा बहिणींना देतील. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी खिल्ली उडवली.

हेही वाचा – Thackeray Vs Fadnavis : महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे हे असे ‘सिंदूर’ रूप…, ठाकरेंचा घणाघात



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.