कलम 370 काढून टाकल्यामुळे काश्मीरमध्ये समृद्धी
Marathi May 31, 2025 06:26 PM

शिष्टमंडळाच्या विदेश दौऱ्यात काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने तेथील फुटीरतावाद संपून समृद्धी आली, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी विदेशात गेलेल्या शिष्टमंडळात खुर्शिद यांचा समावेश आहे. ते संयुक्त जनता दलाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग आहेत. सध्या ते इंडोनेशियामध्ये आहेत.

2019 मध्ये कलम 370 काश्मीरमधून रद्द करण्यात आले होते. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकास झाला आहे. कलम 370 मुळे काश्मीर देशापासून अलिप्त वाटत होते. पण आता ते रद्द केल्यानंतर काश्मीरमधील वातावरण पूर्णपणे बदलले आहे, असे सलमान खुर्शीद म्हणाले. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत 65 टक्के मतदान झाल्याचे उदाहरणही खुर्शिद यांनी दिले. काश्मीरमध्ये आता निवडून आलेले सरकार आहे. त्यामुळे लोक काश्मीरमध्ये समृद्धी आणणाऱ्या सर्व गोष्टी पूर्ववत करू इच्छितात, असे त्यांनी पुढे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले. या कलमामुळे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळाला होता.

सलमान खुर्शिद हे आग्नेय आशियाई देशांना भेट देणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. या शिष्टमंडळात भाजप खासदार अपराजिता सारंगी, ब्रिज लाल, प्रदान बरुआ आणि हेमांग जोशी, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, सीपीएमचे जॉन ब्रिटास आणि माजी भारतीय राजदूत मोहन कुमार यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरचा दौरा करत आहे.

खुर्शिद यांच्या ‘भाषे’त बदल

सलमान खुर्शिद हे काँग्रेस नेते असून त्यांनी यापूर्वी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता. पण आता ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे त्यांच्या भाषेत बदल झालेला दिसत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांवर आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या संरक्षणावर भारताच्या भूमिकेवर जागतिक पातळीवर चर्चा घडवण्याचा प्रयत्न खुर्शिद यांच्यासह शिष्टमंडळाकडून सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.