केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव :10,738 कोटींच्या इंडिया एआय मिशनला मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात स्थानिक भाषा, संस्कृती, परिस्थिती आणि सामाजिक नियमांवर प्रशिक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल विकसित होणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक परिषदेत 2025 मध्ये ‘आम्ही एआय मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली आहे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
मंत्री वैष्णव म्हणाले की, पहिले मॉडेल सर्वम द्वारे विकसित केले जात आहे. तीन किंवा चार अर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि आम्ही एक सामान्य डेटासेट देखील तयार करत आहोत.’ सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात झालेल्या प्रगतीप्रमाणेच एआय देखील समाज आणि उद्योगात प्रचंड बदल आणेल. ते म्हणाले, ‘मला वाटते की असा बदल जेव्हा येतो आहे तेव्हा आपण कोणत्याही उद्योगात असलो तरी आपण सर्वांनीच त्या बदलासाठी तयार असले पाहिजे.’ भारतात आणि जगात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा साधने आणि सेवांचे यश हे सरकारच्या या विश्वासामुळे आहे की तंत्रज्ञान काही लोकांच्या हातात नसावे तर ते सर्वांना उपलब्ध करून दिले पाहिजे. ते म्हणाले की एआयच्या बाबतीतही हाच दृष्टिकोन अवलंबला जात आहे.
सरकारने इंडिया एआय मिशन अंतर्गत 10,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (जीपीयू) प्रदान करण्याचे लक्ष्य ठेवले होते. जेणेकरून हाय-एंड कॉम्प्युटिंग सर्वांना सुलभ होईल. पण यांना पहिल्या फेरीच्या बोलीमध्ये 18,000 हून अधिक जीपीयूसाठी बोली मिळाल्या. ते म्हणाले की कंपन्यांनी दुसऱ्या फेरीच्या बोलीमध्ये सुमारे 14,000 जीपीयू खरेदी करण्यासाठी बोली लावल्या आहेत.
10,738 कोटी रुपयांच्या बजेटसह मार्च 2024 मध्ये इंडिया एआय मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. इंडिया एआय कॉम्प्युट पोर्टलद्वारे, स्टार्टअप्स, अॅप्लिकेशन डेव्हलपर्स, संशोधक आणि विद्यार्थी जीपीयू तसेच एआय क्लाउड सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. वापरकर्त्यांना विविध प्रकारचे हाय-एंड जीपीयू मिळतील, ज्यामुळे देशात एआय संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळेल.