Monsoon : लवकर आलेल्या मान्सूनने झोडपलं, भूस्खलन आणि पूर; पूर्वोत्तर राज्यांमध्ये १९ जणांचा मृत्यू, १२ हजार लोकांचं स्थलांतर
esakal May 31, 2025 08:45 PM

देशाय यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. या मान्सूनने पूर्वोत्तर राज्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हजार पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. मोठ्या संख्येनं लोकांना फटका बसला आहे. नद्या पात्राबाहेर पडल्या असून हवामान विभागाने राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

मिझोरामच्या दक्षिण मिझोराममधील लाँगतलाई शहरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय. यामुळे पाच घरे आणि एक हॉटेल गाडलं गेलं. यात अनेक लोक अडकले आहेत. या ठिकाणी एसडीआरएफसह भारतीय रिजर्व्ह बटालियनच्या टीम्स बचावकार्य राबवत आहेत. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग ५४ बंद झाला आहे. यामुळे लाँगतलाईचा संपर्क तुटला आहे.

आसाममध्ये भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जिल्ह्यांना पावसाचा मोठा फठका बसलाय. १२ हजार लोकांना स्थलांतरित व्हावं लागलंय. गुवाहाटी, सिलचरमध्ये पुरामुळे १० हजार पेक्षा जास्त लोकांना फटका बसलाय. आयएमडीने दिलेल्या अपडेट्सनुसार गेल्या २४ तासात गुवाहाटीसह परिसरात ९० ते १३४ मीमी पाऊस झाला. येत्या दोन दिवसातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अरुणाचलमध्येही मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. भूस्खलनात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वी कामेंग जिल्ह्यात बाना सेप्पा खंड इथं भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू झालाय. तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यातल्या जीरो कामले मार्गावर भूस्खलनात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आलंय. सिगिन नदीला पूर आला असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. एक ते पाच जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. यामुळे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

त्रिपुरातही मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं हाहाकार उडाला आहे. जिरानियात एकाचा बुडून मृत्यू झाला. तर २०० पेक्षा जास्त लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. १०० पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं आहे. हावडा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर मणिपूरमध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नंबुल, इरिल आणि नंबोल नदीने इशारा पातळी गाठली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानं पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.