पुणे : राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना राष्ट्रीय कौशल्य पात्रता अभ्यासक्रम आराखड्यानुसार रुपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हा नवीन व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि २०२६-२७ पर्यंत स्थगिती असणार आहे. तर हा नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून राबविण्यास सुरवात होणार आहे.
राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने या संदर्भातील अध्यादेश नुकताच जाहीर केला आहे. १९६४ मधील डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार अधिकाधिक युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने रोजगार, स्वयंरोजगारास प्रवृत्त करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाणारा लोंढा थांबवावा, याउद्देशाने १९७८-७९ पासून राज्यात व्यवसाय विषयांची ३० टक्के व्याप्ती असलेले आणि द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. सध्या तांत्रिक, वाणिज्य, कृषी आणि मत्स्य गटातील एकूण १६ द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
राज्य सरकारच्या जून २०२३च्या निर्णयानुसार यातील १३ व्यवसाय अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यानुसार (एनएसक्यूएफ) सुसंगत केल आहेत. या एनएसक्यूएफ रुपांतरित द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम हे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राबविण्यास मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राबविण्यासढ़्थगिती दिली होती. आता एनएसक्यूएफ रुपांतरीत नवीन व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्श २०२४-२५ पर्यंत दिलेल्या स्थगितीस शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
‘‘द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समितीने या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत, प्रचलित द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रमांचे राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यामधील रूपांतरण, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी वेळीच होईल, या अनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात येतील, असे जाहीर केले होते. आता राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच हा निर्णय जाहीर करून द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.’’
- व्ही. बी. शाळू, कृती समिती सदस्य