संदीप कुलकर्णी - saptrang@esakal.com
‘डोंबिवली फास्ट’मध्ये मी माधव आपटेची भूमिका साकारली होती. चित्रपटाची सुरुवात जशी वास्तवदर्शी आहे, तसाच तो संपूर्ण मुंबईतील संवेदनशील; पण वेदनादायक वास्तव उलगडतो. त्यानंतर माझी आवडती भूमिका म्हणजे ‘श्वास’ चित्रपटातली डॉ. मिलिंद सानेची. त्यात मी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरची भूमिका साकारली होती. ‘डोंबिवली फास्ट’मधला माधव खूप सामान्य होता, जवळचा वाटायचा; पण ‘श्वास’मधला डॉक्टर, पूर्ण वेगळा माणूस होता. त्यामुळे मला एक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली.
मला आजवर अनेक चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. त्यातील पहिली चांगली भूमिका म्हणजे ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातील. त्या चित्रपटात मी माधव आपटेची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते. हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात आम्ही दाखवलं आहे, की मुंबईसारखं शहर हळूहळू संवेदनशून्य होत चाललं आहे. माणसांमधला जिव्हाळा, एकमेकांच्या दुःखाशी जोडून घेण्याची भावना कमी होत चालली आहे. आधीही लहान-मोठे भ्रष्टाचार होतेच; पण सामान्य माणसाला समाजात काहीतरी योगदान द्यायचं, स्वतःचं स्थान निर्माण करायचं असायचं. आज मात्र परिस्थिती अशी झाली आहे, की सगळंच गोठल्यासारखं वाटतं. लोक बधिर झालेत.
डोंबिवलीसारख्या छोट्या शहरातून लोक मोठ्या शहरात म्हणजेच मुंबईत कामासाठी येतात. मेहनत करतात; पण जर रोजच अन्याय आणि अनागोंदी अनुभवायला आली, तर माणूस एका टप्प्यावर येतो जिथे त्याचा संयम सुटतो. तोल जातो. विवेक मागे पडतो आणि मग तो जे मनात येईल, तेच करू लागतो. हेच मी ‘माधव आपटे’च्या व्यक्तिरेखेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची सुरुवात जशी वास्तवदर्शी आहे, तसाच तो संपूर्ण मुंबईतील संवेदनशील; पण वेदनादायक वास्तव उलगडतो. कॅमेऱ्याचे मूव्हमेंट्स, मुंबईचे विविध पैलू आणि पात्राची बदलती मनःस्थिती, हे सगळं एकत्र येऊन एका सामान्य माणसाच्या अंतर्मनाची व्यथा मांडतो. त्यात एक सीन होता ज्यात अख्खं शहर झोपलेलं असतं आणि माधव आपटे आपल्या भावना रागातून व्यक्त करतो; पण त्याला ऐकायला कोणीच नसतं. त्याचवेळी समोर चित्र काढणारा मुलगा बसलेला असतो; पण तोही मूकबधिर असतो. ही एक प्रतीकात्मक रचना आहे. ज्यात दाखवलं आहे, की समाजात सामान्य माणसाचा आवाज कोणी ऐकतच नाही. माधव आपटे ही भूमिका म्हणजे तणावग्रस्त नागरिकाचं प्रतीक होतं. तो जेव्हा संयम गमावतो, तेव्हा त्याचं लॉजिक मागे पडतं आणि भावना पुढे येतात. एक पोलिस ऑफिसर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो; पण राजकीय दबावामुळे त्याला संपवण्याचा आदेश दिला जातो आणि शेवटी, सिनेमाच्या अखेरच्या सीनमध्ये, माधव आपटेच्या हातात पुन्हा तीच पिस्तूल असते, तो शेवटचा क्षण विचारप्रवृत्त करणारा ठरतो.
आम्ही मेलोड्रामा टाळून हा सिनेमा वास्तववादी ठेवला, कारण समाजातील कटू सत्य अधिक ठळकपणे दाखवायचं होतं. ही समस्या कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल, म्हणूनच हा चित्रपट कधीच जुना होणार नाही.
त्यानंतर माझी आवडती भूमिका म्हणजे ‘श्वास’ चित्रपटातली डॉक्टर मिलिंद सानेची. ‘श्वास’ हा माझा पहिला मराठी सिनेमा होता. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सावंत याने केलं होतं. त्याआधी मी राम गोपाल वर्मा, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासोबत फक्त हिंदी चित्रपट केले होते. त्या काळात मराठी सिनेमांची प्रतिमा फक्त विनोदी ढाच्यात अडकलेली होती; पण त्यात दर्जा नव्हता. त्यामुळे स्वतःहून मराठी सिनेमा करावा असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं; पण एक दिवस संदीप सावंत एका गोष्टीसह माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी एक सिनेमा करतोय आणि त्यात तुला काम करायचंय.’’ त्याने आधी माझी स्क्रीन टेस्ट घेतली आणि सिलेक्ट झाल्यावर स्क्रिप्ट दिली. त्यात मी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरची भूमिका साकारला होती. मला त्या शब्दाचा अर्थदेखील माहिती नव्हता. मग मला सांगण्यात आलं, की कॅन्सर सर्जनला इन्कोलॉजिस्ट म्हणतात. प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे, की या डॉक्टरच्या शब्दांना वजन आहे, अनुभव आहे. ही भूमिका डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्यावर आधारित होती, ज्यांनी प्रत्यक्षात ती केस हाताळली होती. मी त्यांच्याच पुण्यातल्या क्लिनिकमध्ये काही काळ राहिलो, त्यांचं निरीक्षण केलं, ऑपरेशन्स अटेंड केली. मेडिकल टर्मिनोलॉजी, पेशंटशी संवाद कसा साधायचा, अवघड बातमी कशी सांगायची, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकत गेलो. त्या काळात लोकांसाठी ‘कॅन्सर’ हा शब्द म्हणजे सरळ मृत्यूचं चिन्ह होतं; पण डॉ. पुणतांबेकर यांचं वैशिष्ट्य हे होतं, की ते अवघ्या २० मिनिटांत पेशंटचं मन पालटून टाकायचे. त्यांना आशा द्यायचे. त्यांच्या त्या अनुभवातून आणि भावनेतून मला हे पात्र उभं करता आलं. ‘श्वास’मुळे मला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि खूप कौतुक झालं. ‘डोंबिवली फास्ट’मधला माधव खूप सामान्य होता, जवळचा वाटायचा; पण श्वास मधला डॉक्टर, तो पूर्ण वेगळा माणूस होता. त्यामुळे मला एक वेगळी व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली.
‘गैर’ या सिनेमात डबल रोल होता. एकाचसारखे दिसणारे दोन वेगळे पात्र; पण त्यांचं वेगळेपण प्रेक्षकांना स्पष्ट दिसलं पाहिजे, हे खरं चॅलेंज होतं.
‘सत्यशोधक’मध्ये मला महात्मा फुलेंची भूमिका करायची संधी मिळाली, तेव्हा मी दिग्दर्शकाला विचारलं, ‘माझा का विचार केलात?’ त्याने माझा आणि फुलेंचा फोटो बाजूबाजूला ठेवून दाखवला. तो सादृश्य पाहून मला जाणवलं, खरंच... काहीसा चेहरामोहरा जुळतोय; पण तेवढ्यावर न थांबता, पुढची आठ महिने मी महात्मा फुलेंचा सखोल अभ्यास केला. फुले आणि सावित्रीबाई यांचं नातं ‘टू बॉडीज, वन सोल’ असं होतं. फुले अर्धांगवायूने ग्रस्त झाले होते, तरी सावित्रीबाई त्यांची भावना समजून घेत असत. त्या काळात स्त्रीचं शिक्षण म्हणजे निषिद्ध गोष्ट होती; पण या दाम्पत्याने शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केलं, हे सिनेमात दाखवणं आवश्यक वाटलं. फुले स्वतः उच्च शिक्षित होते; पण जातीय व्यवस्थेचं वास्तव त्यांच्या वाट्याला आलं, जेव्हा त्यांना एका मिरवणुकीतून फक्त जात ओळखून हाकलून देण्यात आलं, त्या प्रसंगाने त्यांच्यात वैचारिक क्रांती घडवली. ते नेहमी म्हणत, ‘‘राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी जातीभेद संपणार नाही, जोपर्यंत वैचारिक स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्यासाठी सर्वात आधी शिक्षण ‘प्रथम शिक्षण’.’’ त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. व्यवसाय म्हणून कॉन्ट्रॅक्टर बनले; पण हेतू फक्त पैसा नव्हता, तर समाज उभा करणं होतं. खडकवासला धरण, मंडई यांसारख्या वास्तू त्यांचं योगदान आहेत; पण हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. माझ्यासाठी अशा भूमिका म्हणजे एक प्रकारचं ऋण असतं. त्या व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांच्या भावविश्वात प्रवेश करतो, त्यांचं जीवन जगतो. त्यांच्या वेदना, विचार, अनुभव हे सगळं माझ्या आत खोलवर झिरपत जातं.
शब्दांकन : संतोष भिंगार्डे