तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी
दाखले मिळण्यास विलंब; नागरिक, दिव्यांगांचे कार्यालयात हेलपाटे
अंबरनाथ, ता. १ (बातमीदार) ः शैक्षणिक व इतर शासकीय कामाकरिता तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातून नागरिक दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात येतात, मात्र दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिक तसेच दिव्यांगांनादेखील त्रासाला सामोरे जावे लागत असून, हेलपाटे मारावे लागत आहेत.
अंबरनाथचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी शुक्रवारी (ता. ३०) सेतू केंद्राला भेट दिली. या वेळी नागरिकांनी त्यांच्याकडे दाखले मिळत नसल्याचा तक्रारी सांगितल्या. याबाबत सुभाष साळुंखे यांनी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. सेतू कार्यालयाने आठ दिवसांत सुरळीत काम सुरू न केल्यास जाब विचारणार असल्याचा इशारा साळुंखे यांनी दिला आहे.
व्यवस्थापकाअभावी रखडली केंद्रातील कामे
सेतू कार्यालयाचे कामकाज चालवण्याचा ठेका जीएमके कंपनीला देण्यात आला असून, या ठिकाणी कंपनीमार्फत सचिन घावट यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती, मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव व्यवस्थापकपदाचा राजीनामा दिल्याने आणि त्यांच्या जागी इतर व्यक्तीच्या नेमणुकीस तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राची मागणी केली, असे कंपनी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे व्यवस्थापकाच्या अभावी सेतू केंद्रातील कामे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित व्यवस्थापकाने दिलेला राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही, कंपनी प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहे. तसेच शासकीय दाखले वाटपाचे काम रखडले नसून सेतू कार्यालयातून नियमितपणे दाखले वितरण सुरू आहे.
- अमित पुरी, तहसीलदार, अंबरनाथ