नैसर्गिक संकटामुळे नेहमी मोठे नुकसान होत असते. परंतु कधी कधी नैसर्गिक संकट कोणासाठी फायदेशीर ठरणार का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असणार आहे. पाकिस्तानमधील कराची शहरात भूकंप आला. हा भूकंप त्या ठिकाणी असणाऱ्या कैद्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. कराचीत आलेल्या भूकंपामुळे मलीर कारागृहातील भितींना भेगा पडल्या. त्यामुळे या भिंती तोडून कैदी फरार झाले. या घटनेत २१६ कैदी पळून गेले. त्यातील ८० कैद्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. या घटने दरम्यान झालेल्या गोळीबारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच कर्मचारी जखमी झाले आहे.
कराचीचे डीआयजी मोहम्मद हसन सेहतो यांनी म्हटले की, भूकंपामुळे अनेक कैदी आपल्या बॅरकमधून बाहेर आले. कारागृहाचा गेट तोडून कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. काही बातम्यांनुसार, या कैद्यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांची शस्त्रही हिसकवून घेतली. त्यानंतर पोलीस आणि कैदी यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारा दरम्यान कैदी कारागृहातून फरार झाले. या गोळीबारात एक कैदी जखमी झाला आहे.
कराची कारागृहातून फरार झालेल्या कैद्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी कजाफी टाउन, शाह लतीफ आणि भैंस कॉलोनीसह इतर भागातून पळून गेलेल्या २० कैद्यांना अटक केली आहे. कारागृहाच्या बाहेर रेंजर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपासच्या भागात कसून तपास केला जात आहे.
दरम्यान, सिंधचे कारागृहमंत्री अली हसन झरदारी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कारागृह महानिरीक्षकांकडून त्यांनी अहवाल मागवला आहे. त्यांनी या भागाची नाकेबंदी करण्याचेही आदेश दिले आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा तर नाही ना? त्याचीही चौकशी केली जात आहे.
कराचीमध्ये २४ तासांत दहापेक्षा जास्त भूंकपाचे झटके जाणवले. त्याची तीव्रता २.४ रिश्टेल स्केल होती. रात्री ११.१६ मिनिटांनी लांधी, शेरपाओ आणि कायदाबादसारख्या भागात भूकंप झाला. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, किर्थर फॉल्ट लाइनजवळ असल्यामुळे या भागात भूकंप येणे ही सामान्य बाब आहे.