Thackeray criticizes BJP, calling it the East India Company
Marathi June 02, 2025 08:26 PM


मराठीचे अनेक लढे शिवसेना पन्नास वर्षे लढत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मुंबईतील कष्टकऱ्यांची, गिरणी कामगारांची मराठी भाषा तेजाने तळपत राहावी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम ‘एसंशिं’ गटाने चालवले आहे.

(Thackeray Vs Mahayuti) मुंबई : भाजपाच्या ईस्ट इंडिया कंपनीने (सुरत) मुंबई विकायला काढलीच आहे. स्वतःला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वगैरे म्हणवून घेणारे ढोंगी या ईस्ट इंडिया कंपनीचे भागीदार बनल्यावर मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करणारच. मुंबईची भाषा मराठी नाही असे सांगणे ही त्याची सुरुवात आहे. मराठी माणसाला लढावेच लागेल, असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली आहे. (Thackeray criticizes BJP, calling it the East India Company)

मराठीचा अभिमान भ्रष्टाचार आणि ठेकेदारांच्या पैशांनी विकत घेता येत नाही, हे कोणीतरी भाजपाच्या या सर्व आश्रितांना सांगायला हवे. महाराष्ट्राच्या कणाकणाची भाषा मराठीच आहे. घाटकोपर आणि मीरा-भाईंदरचा तुकडा पाडून तो महाराष्ट्राबाहेर टाकलेला नाही आणि खासगी बिल्डरांनी त्यांचे स्वतंत्र स्वायत्त संस्थान केलेले नाही. महाराष्ट्र अखंड आहे आणि राहील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कितीही स्वाऱ्या केल्या आणि ‘एसंशिं’वाल्यांनी (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट) मुंबई ही अदानी तसेच बिल्डरांच्या घशात घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मराठी मातीतला कण आणि कण ज्वालामुखीसारखा उसळून बाहेर येईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

हेही वाचा – Thackeray on Sarnaik : प्रताप सरनाईक यांना बरखास्त करा, ठाकरेंची मागणी

आपल्या मातृभाषेचा किंवा राजभाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे आम्ही इतर भाषा भगिनींचा द्वेष करतो असे नाही. मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेवर प्रेमाचा वर्षाव करताच त्यांच्या मदतीस भाजपा अध्यक्ष बावनकुळे धावून आले. ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिलाय हे विसरू नका,’’ असे ते म्हणाले. हा दर्जा दिला म्हणून तुमच्या मंत्र्यांना मराठी भाषेचा असा अपमान करण्याचा परवाना मिळाला आहे काय? मराठीच्या छाताडावर उपऱ्यांना बसविण्याची सूट मिळाली आहे काय? याचे आधी उत्तर द्या, असे त्यांनी सुनावले आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे आणि त्यातील साधारण नऊ कोटी लोक मराठी बोलतात. मराठीत व्यवहार करतात. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत भाषा आहे आणि येथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असा कायदा असल्याचे ‘एसंशिं’ गटाच्या मंत्र्यांना माहीत नाही काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची, वीर सावरकरांची, लोकमान्य टिळकांची आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषा आहे. मुंबईतील मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावे, मराठी भाषेचा सन्मान राहावा यासाठीच शिवसेनेची स्थापना झाली. मराठीचे अनेक लढे शिवसेना पन्नास वर्षे लढत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मुंबईतील कष्टकऱ्यांची, गिरणी कामगारांची मराठी भाषा तेजाने तळपत राहावी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम ‘एसंशिं’ गटाने चालवले आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : अर्थखात्यात घोटाळा, अजित पवार राजीनामा द्या; राऊतांनी आरोप करत केली मागणी



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.