राजापुरात १० वर्षांनंतर मे महिना टँकरविना
जलजीवनसह पर्यायी मार्ग ; पावसामुळे उन्हाळ्याचा शेवट गोड, बंधाऱ्याची मदत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः जलजीवन मिशन योजनेंतर्गंत नळपाणी योजनांची सुरू असलेली कामे आणि प्रशासनाने टंचाईग्रस्त वाड्यांना वेळेत पाणीपुरवठ्यासाठीची पर्यायी व्यवस्था केल्यामुळे यंदा राजापूर तालुक्यात टँकर धावलाच नाही. तसेच श्रमदानातून गावोगावी बंधारे बांधल्यामुळे त्यात साठलेला पाणीसाठा पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी पूरक ठरला. मे महिन्यातील पावसाने टंचाईच उरली नाही.
मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न वा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे नळपाणी योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये दरवर्षी लाखो रूपयांचा निधी खर्च करूनही एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटचाईची झळा बसत असे. गतवर्षी तालुक्यात पाण्याचा टँकर धावला होती. मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये गतवर्षी धावलेल्या टँकरची संख्या कमी होती. त्याला गतवर्षी मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसाची साथ मिळाली होती. मात्र, यंदा एप्रिल व मे महिन्यातील वातावरणाची स्थिती लक्षात घेत टंचाईची तिव्रता वाढेल अशीच स्थिती होती. त्यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या पुढाकारानने श्रमदानातून गावोगावी कच्चे बंधारे बांधले गेले. त्यातील मुबलक पाणीसाठी मे महिन्यापर्यंत पूरला. मे महिन्याच्या सुरूवातीला आडवली पुजारवाडी, मोगरे सडेवाडी, कोंडयेतर्फ सौंदळ आणि ओझर धनगरवाडी येथील वाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मागणी केली होती. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी प्रशासनाने टंचाईग्रस्त वाड्या आणि लगतच्या परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग करून त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली.
----
जलजीवन कामाची पूर्तता...
विहीरीतील गाळ उपसा करणे, विहीरीवर पंप बसवून पाणीपुरवठा करणे, साठवण टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करणे, जलजीवन मिशन योजनेतील कामांची पूर्ती करण्यावर भर देणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. या साऱ्या प्रयत्नांना गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचीही साथ मिळाली. गेल्या दशकभरानंतर यावर्षी मात्र, राजापूर तालुक्यातील एकाही गावामध्ये टँकर धावलेला नाही.
---
कोट
राजापूर तालुक्यातील काही गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केलेली होती. मात्र, संबंधित गावांमध्ये पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली. त्यामुळे राजापूर तालुक्यात टँकर सुरू करावा लागला नाही.
- निलेश जगताप, गटविकास अधिकारी राजापूर