आयपीएल 2025 अंतिम फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वॉलिफायर 1 मध्ये पंजाब किंग्सला पराभूत करून एन्ट्री मारली. तर पंजाब किंग्सने क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत एन्ट्री मारली. दोन्ही संघांना 17 वर्षानंतर आयपीएल जेतेपद जिंकण्याची संधी आहे. असं असताना या सामन्यात पाऊस पडेल का? अशी चिंता क्रीडाप्रेमींना सतावत आहे. कारण क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना उशिराने सुरु झाला. दोन तास 15 मिनिटांनी हा सामना सुरु झाला. पण कट ऑफ टाईम वाढवल्याने हा सामना 20 षटकांचा झाला. आता अंतिम फेरीत असं काही झालं तर काय? हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अंतिम सामन्यातही पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडू शकतो.
मंगळवारी, शहरातील काही भागात पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी 38 डिग्री कमाल तापमान आणि 27 डिग्री किमान तापमान असू शकते. अक्युवेदर रिपोर्टनुसार, दिवसा एक तास पाऊस पडू शकतो. इतकंच काय तर संध्याकाही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण पाऊस पडला तरी चिंता करण्याचं कारण नाही. कारण या सामन्यासाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ आहे. तसेच हा सामना 3 जूनला पूर्ण झाला नाही तर 4 जून हा राखीव दिवस आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत या मैदानावर सामना खेळला गेला. यात एकूण 410 धावा झाल्या होत्या. या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ भारी पडला आहे. कारण या पर्वातील आठ पैकी 6 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ भारी पडला आहे. याच मैदानावर सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम पंजाब किंग्सच्या नावावर आहे. याच पर्वात गुजरात टायटन्सविरुद्ध 243 धावा केल्या होत्या. पण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.
या मैदानावर एकूण 42 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 20 सामने जिंकले आहेत. तसेच नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 22 सामने जिंकले आहेत. यावरून या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणे थोडे सोपे आहे. त्यामुळे या पर्वात भले प्रथम फलंदाजी करणारे 8 पैकी 6 जिंकले असतील. पण एकंदरीत नंतर फलंदाजी करणंच फायद्याचं दिसत आहे.