यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे, या दोन्ही संघादरम्यान येत्या 3 जूनला अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे, जर तीन जूनला पाऊस झाला आणि पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर आणखी एक दिवस या सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पण जर समजा राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय होणार? कोणता संघ आयपीएल 2025 चा चॅम्पियन होईल याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊयात याचं उत्तर.
आयपीएलच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे, जर या सामन्यात पाऊस पडलाच आणि सामना रद्द झाला तर त्यासाठी आणखी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र राखीव दिवशीही पाऊस पडला तर मात्र पंजाब किंग्जचा संघ यावर्षीचा चॅम्पियन होणार आहे. कारण पंजाब किंग्जची टीम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे, आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास जी टीम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असते तिला विजेता घोषित केलं जातं. त्यामुळे राखीव दिवशी जर पाऊस झाला तर याचा मोठा फटका हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला बसू शकतो आणि आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं, त्यामुळे असं काही घडू नये अशीच प्रार्थना सध्या हा संघ करत असणार.
आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये अंतिम सामना तीन जूनला रात्री साडेसात वाजता होणार आहे. सात वाजता या सामन्याचा टॉस होईल. हवामानाबाबत बोलायचे झाल्यास या सामन्यावर पावसाचं सावट आहे, त्यामुळे हा सामना थोडा उशिरा सुरू होऊ शकतो. अहमदाबादमध्ये हा सामना होणार आहे, रिपोर्टनुसार सायंकाळी 6 वाजता इथे पाऊस पडण्याची शक्यता 51 टक्के एवढी वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान पंजाबचा संघ सध्या चांगला फॉर्ममध्ये आहे, त्यांनी मुंबईचा पराभव करून अंतिम सामन्यात धकड मारली, त्यामुळे कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.