मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. याप्रकरणी सोमवारी (2 जून) मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत या लिलावातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी त्यांनी विरोधकांनी पुढे येऊन व्यवसाय करून दाखवावा असे आव्हानदेखील केले होते. “जर तुमच्यात दम असेल तर हे हॉटेल तुम्ही घ्या, मी तुमचे स्वागत करतो,” असे म्हणत त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता दानवे यांनीदेखील निशाणा साधला. (Ambadas Danve Shivsen UBT on Shivsena Sanjay Shirsat statement on Hotel scam allegations)
हेही वाचा : Crime : दिव्यांग शाळेत दोन अल्पवयीन भावांचं लैंगिक शोषण, सिगारेटचे चटके अन्…
“आम्ही आमच्या दोन-चार एकर जमिनीवर समाधानी आहोत. आणि हा हॉटेल काय आमचा व्यवसाय नाही. शिरसाटाचा तो धंदा असेल पण आमचा नाही,” असे म्हणत शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला. “त्यांच्या मुलांचे कसे मुलींसोबत संबंध होते? प्रकरण कोणी आणि कसे मिटवले? त्यासाठी कोण आले होते? पण त्यात एक मुलगी होती, म्हणून मी वैयक्तिक कोणावर बोलत नाही. पण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नये,” असा इशारा अंबादास दानवेंनी संजय शिरसाटांना दिला आहे. “तुमची लायकी नाही म्हणून तुम्हाला कोणती बँक लोन देत नाही. मी कोणाकडे लोन मागयाला गेलो नव्हतो, तरीसुद्धा बँका माझ्या दारात लोन देण्यासाठी आल्या आहेत. ही इज्जत कमवावी लागते. पण तुमची लायकी नसल्यामुळे तुम्हाला कोणती बँक लोन देत नाही,” अशी टीका शिरसाटांनी दानवेंवर केली. मात्र ही लोकं सत्तेचा गैरवापर करुन बँकेकडून लोन घेत असल्याचा आरोप अंबादान दानवेंनी केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी महसूल विभागाने व्हिट्स हॉटेल विक्रीसाठी केलेल्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांना फायदा पोहोचवण्याच्या हेतूने बाजार मूल्यापेक्षाही कमी किमती लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केला. रेडीरेकनरनुसार या हॉटेलची किंमत 110 कोटी तर बाजार भाव मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या हॉटेलची किंमत 100 कोटींपेक्षा अधिकची आहे. फक्त शिरसाट यांना हॉटेल विकत घेता यावे त्यासाठी हा लिलाव केला होता का? मुळ किंमतीपेक्षा कमी पैशांमध्ये हा व्यवहार झाल्यानं ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. या महोदयांकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित केला. आता यावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.