भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता विराट केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीतून निवृत्ती घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विराट भारताकडून जवळपास दोन दशकांपासून क्रिकेट आता खेळत आहे. त्यामुळे त्याचा जर्सी क्रमांक १८ ही त्याची एकप्रकारे ओळखही बनली आहे. पण आता कसोटीतून निवृत्तीनंतर त्याचा हा जर्सी क्रमांक दुसऱ्या कोणाला मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण, सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या खेळणाऱ्या मुकेश कुमारने पहिल्या चार दिवसीय सामन्यात १८ क्रमांकाची जर्सी घातली होती. त्यामुळे याबाबत चर्चांना उधाण आले. विराट अद्याप वनडेत सक्रिय असल्याने तो वनडेमध्ये त्याच्या १८ क्रमांकाच्या जर्सीमध्येच खेळताना दिसणार आहे.
पण आता असे समजत आहे की ज्याप्रकारे सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक १० आणि एमएस धोनीचा जर्सी क्रमांक ७ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना कोणी वापरत नाही, तसेच विराट कोहलीच्या जर्सी क्रमांक १८ बाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
तथापि, जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मुकेश हा भारतीय कसोटी संघाचा सध्या भाग नाही, पण जरी त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून निवड झाली, तरी तो त्याच्या पूर्वीच्याच ४९ क्रमांकाची जर्सी घालून खेळताना दिसेल. त्याने ज्यावेळी इंग्लंड अ संघाविरुद्ध १८ क्रमांकाची जर्सी घातलेली तेव्हा तो भारत अ संघाचा भाग होता आणि त्याच्या जर्सीवर कोणाचे नावही नव्हते.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, 'मुकेशने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या कसोटी समन्यात १८ क्रमांकाची जर्सी घातलेली. पण जेव्हा तुम्ही भारत अ संघाकडून खेळता तेव्हा जर्सीवर नावही नसते आणि कोणताही क्रमांक निश्चित नसतो. कोणीही कोणताही क्रमांक घेऊ शकतो. जर्सी क्रमांक केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी महत्त्वाचे आहेत.'
दरम्यान, भारतीय संघाला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही निवृत्ती घेतल्याने उपलब्ध नसतील. भारताच्या संघात युवा साई सुदर्शनला आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसेच करुण नायरचे संघात पुनरागमन झाले आहे.